नवी दिल्ली : देशात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच देशातील नेते मंडळीसुद्धा महिलांवरील कमेंट्स करण्यात मागे राहत नाहीत. नुकतेच राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांचे महिलांविषयी केलेले वक्तव्य वादाचा विषय बनला आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बोलताना त्यांनी महिला शिक्षणविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “महिला भांडखोर असतात. त्यांचा हा गूणच त्यांना पुरुषांच्या पुढे जाण्यापासून रोखतो. ज्या शाळांमध्ये अधिक महिला कर्मचारी असतात, तेथे भांडणाचे प्रमाण अधिक असते. महिलांच्या शाळेतील भांडणांसंदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी येतात. जर आपण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा, केली तर पुरुषांच्याही पुढे असाल, असेही डोटासरा म्हणाले. डोटासरा पुढे बोलताना म्हणाले, “महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते”. ते म्हणाले, “सरकारने महिलांसाठी योजना आणल्या आहेत. सरकार महिलांना प्राधान्य देत आहे. त्यांनी या सर्व गोष्टींतून बाहेर पडून पुरुषांच्याही पुढे जावे.” यापूर्वी कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांचे वक्तव्यही चर्चेत आले होते. ते म्हटले होते, आधुनिक भारतीय महिला मुलांना जन्म देऊ इच्छित नाहीत. एकतर त्यांची अविवाहित राहण्याची इच्छा असते अथवा लग्नानंतरही त्यांची मुलांना जन्म देण्याची इच्छा नसते. त्यांना सरोगसीद्वारे मुले हवी आहेत. आपल्या विचारात हा बदल योग्य नाही, असे डॉ. के. सुधाकर यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बोलताना म्हटले होते.