पुणे – भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असून, सातत्यपूर्ण आर्थिक धोरणामुळे विदेशी गुंतवणुकीसाठी महत्वाचे केंद्र ठरत आहे. गुंतवणूक, पतधोरण आणि औद्योगिक विस्तारासाठी पोषक वातावरण देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासात भर घालत आहे. यामध्ये सनदी लेखापाल (सीए) व मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) यांचे योगदान मोलाचे आहे, असे मत ‘आयसीएआय’च्या कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेसचे (सीएमआयबी) अध्यक्ष दुर्गेश काबरा यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेस (सीएमआयबी) आणि आयसीएआय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवादसत्रात ते बोलत होते. डीएसपी म्युच्युअल फंडचे साहिल कपूर, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य यशवंत कासार, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
काबरा म्हणाले, “उद्योगांना सावरण्यासाठी सनदी लेखापाल महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. आयसीएआय नेहमीच सीए, उद्योग आणि संबंधित सर्व भागीदारांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. सीए, सीएफओचे काम हे पांडवांप्रमाणे आहे. एकनिष्ठ, सक्षम कार्यशैली, ध्येयासक्त, समर्पित भावना, प्रामाणिकपणा व कामातील सचोटी तुम्हाला यशाकडे घेऊन जाते.”