एकूण 300 पैकी 69 जणांचे प्राणांतिक अपघात : प्रशासनाच्या गांभीर्याबद्दल शंका
पुणे – पीएमपी ताफ्यातील ठेकेदारांच्या अनेक बस संचलन करतात. या बसेसचे गेल्या पाच वर्षांत सुमारे 300 अपघात झाले असून यात 69 जणांचे प्राणांतिक अपघात झाले आहेत. तर, 108 जणांचे गंभीर अपघात झाले आहेत. या आकडेवारीवरून या बसेस प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे दिसून आले आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2 हजारांहून अधिक बसेस आहेत. त्यातील काही बसेस प्रशासनाने भाडेतत्वावर घेतल्या आहेत. या बसेसचे सन 2016-17 मध्ये 97 अपघात झाले आहेत. तर, सन 2017-18 मध्ये 59 अपघात झाले आहेत. 2018-19 मध्ये 49 अपघात तर 2019-20 मध्ये ठेकेदारांच्या बसेसचे 26 अपघात झाले आहेत. यात 69 प्राणांतिक अपघात झाले असून नागरिकांचे बळी गेले आहेत. तर, सुमारे 108 जणांना गंभीर अपघात झाले आहे.
तर 120 किरकोळ अपघात झाले आहेत. 2019 मध्ये प्रशासनाने 583 नव्या बसेसची खरेदी करण्यात आली आहे. यात सध्या ताफ्यात असलेल्या 400 सीएनजी, 150 ई-बस आणि 33 तेजस्विनी बसेस आहेत. त्याचबरोबर आणखी काही दिवसांत नव्या 350 भाडेतत्वावरील ई-बस दाखल होणार आहेत. तर, 480 सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. प्रशासन सध्या भाडेतत्त्वावरील बसेस ताफ्यात दाखल करत आहे. मात्र, भाडेतत्त्वावरील बस प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना करत नसल्याचे दिसून येत आहे.
सासवड मार्गावर जादा बसेस
गेल्या अनेक दिवसांपासून बोपदेव घाटातील मार्गावरून जाणाऱ्या पीएमपी बसची संख्या अपुरी होती. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत होता. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने बोपदेव घाटातून सासवडकडे जाणाऱ्या बसची संख्या वाढवली आहे.आधी या मार्गावरून पाच बस सोडल्या जात होत्या. आता ही संख्या आठ करण्यात आली आहे. तसेच, दिवेघाट मार्गावरून 2 बस धावणार असून दर एक तासाला या बस धावतील, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, अनेकदा लांब पल्याच्या मार्गावर जुन्या बसेस पाठवण्यात येत असल्याने ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश वेळा या बसेस घाट रस्त्यात बंद पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर सुस्थितीतील बस पाठवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
बेशिस्त ठेकेदारांवर कारवाई कधी?
भाडेतत्त्वावरील पीएमपी बसचे ब्रेकडाऊन सतत वाढत आहे. त्यामुळे, पीएमपीएमएल प्रशासनाने बेशिस्त ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.
दोन वर्षांत 12 बसेसना आग
शहरात मागील दोन वर्षांत 12 बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत. या घटनांमध्ये अनेक प्रवाशांना गंभीर इजा झालेली आहे. तरीही, कोणत्याही उपाययोजना न करता भाडेतत्त्वावरील बसेसचे अपघात सुरूच आहेत. पुढील काळात भाडेतत्त्वावरील बसचे ब्रेकडाऊन आणि अपघातांसारख्या घटना कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
बस पुरवणारे ठेकेदार
ट्रेड टाइम कार रेंटल
अँटोनी
बी.व्ही.जी.
महालक्ष्मी
ओलेक्ट्रा