प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 24 – ठेकेदारांनी तीन महिन्यांपासून वेतन दिले नसल्याने पीएमपीच्या सुमारे 400 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी अचानक संप सुरू केला. यामुळे सायंकाळी कामावरून सुटलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी तासन्तास बसची वाट पाहावी लागत होती.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1600 हून अधिक बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. यातील 309 ई-बस आणि 600 हून अधिक सीएनजी बस ठेकेदारांच्या आहेत. बुधवारी निगडी, औंध, स्वारगेट आणि न.ता. वाडी डेपोतील ई-बस चालकांनी काम बंद आंदोलन करून वेतन मिळेपर्यंत बस न चालविण्याचा पवित्रा घेतला आहे.
कंत्राटदारांकडून नागरिकच वेठीस
पीएमपीच्या ताफ्यात 50 टक्के हून अधिक बस या ठेकेदारांच्या आहेत. ठेकेदार कधी त्यांना पीएमपीने पैसे दिले नाही म्हणून संप करतात, तर कधी कर्मचारी वेतन दिले नाही म्हणून संप करतात. यात सामान्य प्रवासी विनाकारण भरडला जात आहे. पीएमपी प्रशासन सर्वच काही ठेकेदारांना देणार असेल, तर भविष्यात नागरिकांना ठेकेदाराकडून वेगवेगळ्या कारणासाठी वेठीस धरले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.