नगर – 1999 मध्ये पाथर्डी न्यायालयासमोर झालेल्या सुलेनाम्यात गोपाळ समाजातील चालीरिती, रूढी-परंपरा, मानमाप हे रद्द करीत समाजाला बरोबर घेवून मढी येथील मानाची सामुहिक होळी पेटविली जाईल, असे ठरले असतांना देवस्थान, तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त मागवून जुन्याच मानकऱ्यांच्या हस्ते मानाची होळी पेटविली. यामुळे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे गोपाळ समाजाचे मत असून याबाबत चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
पाथर्डी तालुक्यातील श्री.क्षेत्र मढी या ठिकाणी गोपाळ समाजाला होळी पेटविण्याचा मान देऊन 42 दिवस चालणाऱ्या मढी यात्रेला सुरुवात झाली. परंतु होळी पेटविण्याच्या मानावरून 1990 साली दोन गटात वाद होऊन तो वाद पाथर्डी न्यायालयात गेला. पाथर्डी न्यायालयामध्ये हा वाद रे.मु.न.36/90 असा दावा दोन्ही गटाकडून दाखल झाला. या दाव्यामुळे मढी येथील मानाची होळी नऊ वर्ष बंद होती.
1999 साली दोन्ही गटातील लोक एकत्रित बसले व हा वाद संपूष्टात आणण्यासाठी पाथर्डी न्यायालयासमोर सुलेनामा केला. त्या सुलेनाम्यामध्ये गोपाळ समाजातील सर्व चालीरिती, अंधश्रद्धा, रूढी -परंपरा, मानपान हे रद्द करून यापुढे देशातील गोपाळ समाजाला सोबत घेवून मढी येथील मानाची सामूहिक होळी पेटवली जाईल, असे ठरले असताना देखील जुन्या मानकऱ्यांनी न्यायालयाचा अवमान करून देवस्थान व तहसीलदारांना न्यायालयाच्या आदेशानुसार मानकऱ्याना मान देण्यात यावा, असे दरवर्षी पत्र देऊन होळी पेटविण्याचा मान स्वतःकडे ठेवला.
यावर्षी न्यायालयाचा अवमान होत असल्याबाबत तहसीलदार, देवस्थान, प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे निदर्शनात आणून दिले असताना देखील देवस्थान, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त मागवून जुने मानकऱ्यांचा सत्कार करून लोखंडी कंपाउंड करून त्या कंपाउंडमध्ये 6 मानकऱ्यांना आतमध्ये पाठवून सर्व प्रशासनासमोर होळी पेटवू दिली. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊन अवमान झाला आहे.
याला जबाबदार कोण असा प्रश्न गोपाळ समाजाला पडला आहे. हा एक मोठा प्रश्न असून यात काही काळेबेरे तर नाही झाले ना? असा प्रश्न सर्वसामान्य समाज बांधवांना पडत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.