पाणीपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष; महिला वर्ग संतप्त : उपाययोजना करण्याची मागणी
कात्रज – कात्रज परिसरातील नवी वसाहत येथील गल्ली नंबर 11 येथे अनेक घरांमध्ये काही दिवसांपासून पाइपलाइनद्वारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिक व महिला हैराण झाले आहेत. या संदर्भात अनेक वेळा पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करून देखील अद्यापही उपाय झाला नाही. त्यामुळे महिलांच्या संतापाचा पार वर चढला आहे.
कात्रज येथील नवी वसाहतमध्ये गल्ली नंबर 11 येथे दोन फूट जमिनीच्या खालून अंतर्गत पिण्याच्या पाण्याची तीन इंची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्याद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र, याच पाइपलाइनच्या शेजारी जमिनीच्या अंतर्गत सांडपाण्याचे गटार आहे. त्याचे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी या पाइपलाइनमध्ये मिश्रित होऊन घरातमध्ये नळाला दुर्गंधीयुक्त काळे पाणी येत आहे, अशी तक्रार या परिसरातील महिलांची आहे. तर पाइप लाइन टाकण्यासाठी शोधण्यात आलेली जागेच्या त्याठिकाणी राडारोडा तसाच पडून आहे. दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहेत. यावर लवकरात लवकर उपाय करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील महिला वर्ग करीत
आहे.
नवी वसाहत कात्रज येथील गल्ली नंबर 11 येथे अंतर्गत पिण्याच्या पाइपलाइन नव्यानेच बदलण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांना जुनेच कनेक्शन जोडण्यात आले होते. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आली असून लवकरात लवकर करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येईल.
– कुणाल यादव, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग
गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात दुर्गंधीयुक्त व दूषित असे काळ्या रंगाचे पाणी पाइपलाइनद्वारे येत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने पाणी दुसरीकडून आणावे लागत आहे तर अनेक वेळा तक्रार करूनदेखील पाणीपुरवठा विभागाकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे विनाकारण आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे.
सुरेखा वासावे, स्थानिक महिला