मुंबई/नवी दिल्ली – प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घट झाल्याने देशभरात टोमॅटोची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईसह देशातील अनेक शहरांत टोमॅटोचे दर 150 पार गेले आहेत. विशेषत: उत्तर भारतात टोमॅटोच्या दरांनी अचानक उसळी घेतली असून, उत्तराखंडमधील काही शहरांत 200 ते 250 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे. मुंबई आणि परिसरातही टोमॅटोला 120 ते 160 रुपये किलो असा भाव मिळत आहे.
तीव्र उन्हामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन दरवर्षी जून-जुलै महिन्यात त्याचे दर वाढतात. मात्र, यंदा दराने अभूतपूर्व उच्चांक गाठला आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडयापर्यंत 30 ते 35 रुपये किलो दर असलेल्या टोमॅटोचा भाव जूनअखेरीपासून वाढला असून, गेल्या दहा दिवसांत हे दर जवळपास चार पटीने वाढले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यापासून टोमॅटोच्या दरांत 445 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
गतवर्षीपेक्षा अधिक कडक उन्हाळा आणि अचानक झालेला बेमोसमी पाऊस या दोन्ही कारणांमुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशभरातील 50हून अधिक शहरांत टोमॅटोचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. यातील अनेक शहरे उत्तर भारतातील आहेत.
उत्तराखंडमधील गंगोत्री धाम येथे शुक्रवारी 250 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत होती. चेन्नईमध्ये टोमॅटो 100-130 रुपयांवर पोहोचल्यानंतर तामिळनाडू सरकारने शिधावाटप केंद्रांवर 60 रुपये किलो दराने तो उपलब्ध करून दिला आहे. कर्नाटकातही टोमॅटोला 101 ते 121 रुपये इतका दर मिळत आहे.