नवी दिल्ली – राज्यसभेची उमेदवारी किंवा राज्यपाल पद देण्याच्या आमिषाखाली 100 कोटी रूपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. दरम्यान, यातील एक आरोपी चौकशी दरम्यान अधिकाऱ्यांवर हल्ला करत पलायन करण्यात यशस्वी झाला आहे. त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील लातूर येथील कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकातील बेळगावचा रविंद्र विठ्ठल नाईक, दिल्लीचे महेंद्रपाल आरोरा, अभिषेक बुरा आणि मोहम्मद इजाझ खान यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बंडगर स्वत: वरिष्ठ सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत होता आणि बड्या अधिकाऱ्यांशी आपले संबंध असल्याचा देखावा करायचा असा आरोप आहे.
राज्यसभेचे तिकीट, राज्यपाल पदावर नियुक्ती, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयात आणि संघटनांमध्ये नियुक्तीचे आमिष दाखवत लोकांना गंडा घालण्याचा त्यांचा प्लॅन होता. राज्यसभेच्या तिकीटासाठी तब्बल 100 कोटी रूपये कमावण्याची योजना त्यांनी तयार केली होती. सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवणारा बंडगर याने तर स्थानिक पोलीस ठाण्यांत धमकावत तपासावर प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न केला होता, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.