हैदराबाद : तेलंगणात इतर पक्षांप्रमाणेच कॉंग्रेसला सलग १० वर्षांचा कार्यकाळ लाभेल. त्यामुळे राज्यात वर्ष २०३४ पर्यंत कॉंग्रेसची सत्ता असेल, असा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री ए.रेवंथ रेड्डी यांनी रविवारी केला. आंध्रप्रदेशचे विभाजन होऊन वर्ष २०१४ मध्ये तेलंगणा हे स्वतंत्र राज्य असित्वात आले. त्या पार्श्वभूमीवर, अविभाजित आंध्रातील मागील सरकारांच्या कार्यकाळांचा संदर्भ देऊन रेड्डी यांनी भूमिका मांडली. आंध्रचे विभाजन होण्याआधी १९९४ ते २००४ या कालावधीत तेलगू देसम पक्षाची सत्ता होती. त्या पक्षानंतर सलग १० वर्षे म्हणजे २०१४ पर्यंत कॉंग्रेस पक्ष सत्तेत राहिला. तेलंगणच्या स्थापनेपासून सुमारे १० वर्षे भारत राष्ट्र समितीचे सरकार होते. त्यानंतर पुन्हा कॉंग्रेसला सत्ता मिळाली. जनादेशाचे स्वरूप विचारात घेता २०३४ पर्यंत नक्कीच तेलंगणाचा कारभार कॉंग्रेसचे सरकार सांभाळेल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तेलंगणातील एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यामध्ये कॉंग्रेसचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला.