थिरूवनंतपूरम – कॉंग्रेस आणि मित्रपक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केरळमधील जागावाटप निश्चित केले. त्यानुसार, कॉंग्रेस त्या राज्यातील २० पैकी १६ जागा लढवणार आहे. पुन्हा केरळमधून लढण्याविषयी पक्षाचे नेते राहुल गांधी काय निर्णय घेणार याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
केरळमध्ये डाव्या पक्षांची आघाडी सत्तेवर आहे. तर, कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) विरोधी बाकांवर आहे. त्या दोन आघाड्यांमध्येच केरळमध्ये प्रामुख्याने लढत होईल. विशेष म्हणजे, दोन्ही आघाड्यांतील पक्ष देशव्यापी आघाडी इंडियाचे घटक आहेत.
पण, केरळमध्ये भाजपचा फारसा राजकीय प्रभाव नसल्याने डावी आघाडी आणि यूडीएफ एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहे. त्यासाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि मित्रपक्षांनी जागावाटपावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्यातील समझोत्यानुसार आययूएमएल २ जागा लढवेल. तर, केसीजे (जे) आणि आरएसपी प्रत्येकी १ जागा लढवणार आहे.
दरम्यान, राहुल यांनी पुन्हा केरळमधील वायनाडमधूनच निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी प्रदेश कॉंग्रेसने केली आहे. यावेळी राहुल तेलंगणा किंवा कर्नाटकमधून रिंगणात उतरणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मागील निवडणुकीत राहुल यांनी वायनाडमधून ४ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता.