गुवाहाटी – आसामात कॉंग्रेसने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून त्यांनी आपला पक्ष सत्तेवर आल्यास राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची ग्वाही दिली आहे. मोफत वीज आणि सामान्य नागरीकांसाठी न्याय योजना राबवण्याचेही आश्वासन पक्षाने दिले आहे. तसेच प्रत्येक कुटुंबातील किमान एकाला नोकरी अशी आश्वासनेही कॉंग्रेसकडून देण्यात आली आहेत.
प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना पक्षातर्फे ही आश्वासने दिली. आसामात मार्च, एप्रिल मध्ये निवडणुका होणार आहेत. ते म्हणाले की, आसामातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून राज्यात एमएसपीची पद्धत राबवली जात नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची अत्यल्प रक्कम मिळत आहे. त्यातून त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.
कॉंग्रेसने राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि मध्यप्रदेशात सत्तेवर आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांची कर्ज माफ केली होती. तशीच माफी आम्ही आसामातील शेतकऱ्यांसाठी लागू करू. कॉंग्रेसने लोकसभा जाहींरनाम्यात न्युनतम आय योजना म्हणजेच न्याय योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते.
ती योजना आम्ही आसामात राबवणार आहोत असे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसने आसामात गरीबांना मोफत वीज योजना सुरू केली होती. त्यानुसार राज्यातील जनतेला तीस युनिट मोफत वीज मिळत आहे. मोफत वीजेचे हे प्रमाण वाढवण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.