जयपूर – बंडाचे निशाण फडकावलेल्या सचिन पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांना शह देण्यासाठी काँग्रेसतर्फे एक पर्यायी योजना आखण्यात आल्याची माहिती आहे. यानुसार जर पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधीच्या प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला तर काँग्रेसतर्फे ही पर्यायी योजना वापरण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यात पायलट गटाने पक्षविरोधी कृत्य केलं नसल्याचं सांगत काँग्रेसच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होत. याप्रकरणाची उद्या सुनावणी होण्याची शक्यता असून उद्या निकाल पायलट यांच्या बाजूने लागल्यास पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसने आधीच शोधून ठेवल्याचं दिसतंय. याबाबत एनडीटीव्ही या वृत्तसंकेतस्थळाने काँग्रेसच्या लीगल टीममधील सूत्रांच्या हवाल्याने एक वृत्त दिलं असून यामध्ये असं झाल्यास काँग्रेस विधानसभेचे अधिवेशन बोलावणार असल्याचं म्हंटलं आहे.
विधानसभेचे अधिवेशन भरवल्याने काय सध्या होणार? पायलट यांच्या बंडानंतरही आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा काँग्रेसने यापूर्वी केला आहे. यामुळे अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री गेहलोत आपलं संख्याबळ सिद्ध करण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांना काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचा व्हिप बजावला जाईल.परिणामी प्रत्येक काँग्रेस आमदाराला मुख्यमंत्री गेहलोत यांच्या सरकारच्या बाजून मत द्यावं लागेल.
विरोधात मतदान केल्यास काय?
काँग्रेसनं व्हिप काढल्यानंतर जर पायलट यांच्या गटानं गेहलोत यांच्या विरोधात मतदान केलं तर पक्षांतरबंदी कायद्याच्या २(१)(b) अनुसार व्हीप विरोधात मतदान केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. परंतु अशी कारवाई झाल्यास त्याला न्यायालयामध्ये आव्हान देता येत.