बंगळुरू – कर्नाटकमध्ये झंझावाती प्रचार सुरू ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अनोखी भूमिका मांडली. बंगळुरूमध्ये मी जनता जनार्दनाचे दर्शन घेतले. त्या जनतेने मला अभूतपूर्व प्रेम दिले. तो प्रतिसाद पाहून भाजपच्या वतीने कर्नाटकमधील जनताच निवडणूक लढवत असल्याचे माझे मत बनले, असे त्यांनी म्हटले.
बंगळुरूमधील रोड शोला मिळालेल्या प्रतिसादाचा संदर्भ देऊन मोदी बादामीत झालेल्या सभेत बोलत होते. कर्नाटकमधील निवडणूक मोदी किंवा भाजपचे नेते-उमेदवार लढवत नाहीत. निवडणुकीचे संपूर्ण नियंत्रण जनतेने हाती घेतले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कर्नाटकमधील भाजपचे सरकार 40 टक्के कमिशन सरकार असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. त्यावरून मोदींनी पलटवार केला. कॉंग्रेसची ओळख 85 टक्के कमिशनसाठी आहे.
तो पक्ष कधीच जनसेवेचे कार्य करू शकत नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. कॉंग्रेसने कर्नाटकमधील जनतेचे मन जिंकण्यासाठी पाच हमी दिल्या आहेत. त्यावरून मोदींनी हावेरीमध्ये झालेल्या दुसऱ्या सभेत बोलताना त्या पक्षाचा समाचार घेतला. सुमारे 50 वर्षांपूर्वी कॉंग्रेसने गरिबी हटवण्याची सर्वांत मोठी हमी दिली. मात्र, अजूनही सुरू असलेली ती सर्वांत मोठी फसवणूक ठरली. कॉंग्रेसजनांकडून पसरवले जाणारे खोटे भाजपच्या वादळात उडून जाईल, असे ते म्हणाले.