जयपूर – राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय नाट्यामध्ये माजी मुख्यमंत्री व भाजप नेत्या वसुंधरा राजे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आज एका काँग्रेस आमदाराने राजे यांचं नाव गेहलोत सरकार अस्थिर करण्यासाठी ‘घोडेबाजार’ करणाऱ्या एका मध्यास्थ्याशी जोडलं आहे.
आमदार राजेंद्र गुडा यांनी याबाबत बोलताना, “घोडेबाजार प्रकरणी अटकेत असलेला संजय जैन हा इसम मला आठ महिन्यांपूर्वी भेटला होता. त्याने वसुंधरा राजे व इतरांच्या भेटीसाठी देखील विचारलं होत. जैन यांच्यासारखे अनेक मध्यस्थी कर्यरत होते मात्र त्यांना यश आलं नाही. जैन बऱ्याच दिवसांपासून घोडेबाजारीच काम करत होता.” असा आरोप लगावला.
एकीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे खासदार हनुमान बेनीवाल, ‘राजे या गेहलोत सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत’ असा आरोप करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आमदारानेही राजे गेहलोत सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होत्या असा आरोप केलाय.
दरम्यान, वसुंधरा राजे या राजस्थान भाजपमधील बड्या नेत्या आहेत. सचिन पायलट यांनी याआधीच आपल्याला मुख्यमंत्रीपद हवं असल्याचं स्पष्ट केल्याने ते भाजपमध्ये आल्यास वसुंधरा राजेंचं काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
तत्पूर्वी, सचिन पायलट यांनी आपल्याकडे ३० आमदारांचे पाठबळ असल्याचं म्हंटलं होते. विशेष म्हणजे भाजपला सत्तास्थापण्यासाठी ३० आमदारांच्या पाठिंब्याचीच गरज आहे. असं असलं तरी सध्या दिसत असलेल्या चित्रानुसार पायलट यांच्याकडे १८ आमदारांचे पाठबळ असून काँग्रेसतर्फे त्यांना अपात्र ठरवण्यासाठी हालचाली सुरु आहेत.
हे देखील वाचा : पायलट गटाला अपात्र ठरवण्यासाठी काँग्रेसचा ‘प्लॅन-बी’ तयार
आमदार गुडा यांनी यावेळी बोलताना काँग्रेसकडे बहुमतासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ असल्यानेच भाजपकडून बहुमत चाचणीची मागणी केली जात नसल्याचा दावा केला.