पाटणा – बिहारची सत्ता राखणाऱ्या एनडीएची दमछाक करणाऱ्या विरोधकांच्या महाआघाडीची शर्थीची झुंज अयशस्वी ठरली. त्यापार्श्वभूमीवर, कॉंग्रेसमुळेच महाआघाडीला सत्ता मिळवण्यात अपयश आल्याची कबुली देत ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी स्वपक्षाला घरचा आहेर दिला.
राजद नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची महाआघाडी बिहार विधानसभा निवडणुकीला सामोरी गेली. प्रामुख्याने राजद आणि डाव्या पक्षांची कामगिरी चांगली झाल्याने महाआघाडीने एनडीएला चांगलेच झुंजवले.
मात्र, इतर मित्रपक्षांच्या तुलनेत कॉंग्रेसची कामगिरी सुमार ठरली. तो पक्ष वाट्याला आलेल्या 70 पैकी केवळ 19 जागांवर विजय मिळवू शकला. कॉंग्रेसच्या सुमार कामगिरीमुळेच महाआघाडीला सत्तेपासून वंचित रहावे लागल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. त्याचा संदर्भ देऊन अन्वर यांनी स्वपक्षाला तातडीने आणि सखोल आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले.
निवडणुकीत 5 जागा जिंकणाऱ्या एमआयएमचा बिहारमध्ये प्रवेश शुभसंकेत नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली. ट्विटरवरून भूमिका मांडताना अन्वर यांनी एनडीएवरही निशाणा साधला. येनकेन प्रकारे एनडीएने विजय मिळवला. त्यामुळे बिहारचा पराभव झाला.
बिहारला परिवर्तन हवे होते, असे त्यांनी म्हटले. गैरमार्गांचा अवलंब करून एनडीएने बिहारची सत्ता काबीज केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.