नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्ष विचारसरणी आहे आणि विचारसरणी कधीच मृत पावत नाही, असे ठाम प्रतिपादन कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी केले. कॉंग्रेसच्या महान नेत्यांमुळेच भारत जगातील सर्वांत मोठी लोकशाही बनला, असे परखड भाष्यही त्यांनी केले. कॉंग्रेसच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना खर्गे यांनी पक्षाचे महत्व अधोरेखित करतानाच सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. कॉंग्रेस संपल्याचे काही जण म्हणतात. त्यांना मी सांगू इच्छितो की आमच्याकडे कमी सत्ता असू शकेल; पण आमचा कणा अजूनही ताठ आहे. राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, गरिबांचे हक्क आदींबाबत आम्ही कधीच तडजोड केली नाही. आम्ही सत्तेत नसलो तरी कुठली सौदेबाजी करणार नाही. कॉंग्रेसने कधी धर्माच्या नावावर मते मागितली नाहीत. कॉंग्रेस पक्ष जोडण्याचे; तर भाजप तोडण्याचे काम करतो. आज भाजपकडे सत्ता आहे; पण सत्य नाही. त्यामुळेच महत्वाचे आकडे दडवले जातात. कधी जनगणना रोखली जाते. तर, कधी राज्यघटना बदलण्याची भाषा केली जाते. जे आज इतिहासावर भाषणे देत आहेत; त्यांचे पूर्वज इतिहासापासून पळ काढत होते, अशी शाब्दिक तोफ त्यांनी डागली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सुमारास जगातील अनेक देशांनाही स्वातंत्र्य लाभले. त्यातील काही देश अयशस्वी ठरले. तर काही देशांत हुकूमशाही प्रस्थापित झाली. मात्र, भारतात लोकशाही जिवंत राहिली, असे म्हणत खर्गे यांनी कॉंग्रेसला आणि पक्षाच्या महान नेत्यांना श्रेय दिले. संबंधित सोहळ्यावेळी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया आणि राहुल गांधी तसेच पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.