नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सध्या एका दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वसुंधरा राजे आणि भाजपच्या दोन आमदारांनी २०२० मध्ये माझे सरकार वाचवले होते”, अशी धक्कादायक कबुली दिली आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या राजकारणात गोंधळ उडाला आहे.
काँग्रेसचे नेते सचिन पायलट आणि इतर १८ आमदारांनी जुलै २०२० मध्ये गेहलोत यांच्याविरुद्ध बंड केले होते. सुमारे महिनाभर चाललेल्या या प्रकरणात शेवटी पायलट यांनी उपमुख्यमंत्रिपदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर हे बंड थंड झाले होते. या प्रकारावर गेहलोत यांनी येथील एका कार्यक्रमात जाहीर भाष्य केले.
बंडखोरी केलेल्या आमदारांनाही गेहलोत यांनी यावेळी आवाहन केले. “भाजपकडून घेतलेले पैसे परत करून टाका म्हणजे तुम्हाला कोणत्याही दबावाशिवाय तुमचे कर्तव्य पार पाडता येईल.” असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. पुढे बोलताना,“सरकार कसे वाचले याबाबत गेहलोत यांनी जाहीर कबुली दिली. “भारतीय जनता पक्षाच्या तीन नेत्यांमुळे माझे सरकार वाचले. त्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलास मेघवाल आणि आमदार शोभाराणी कुशवाह यांचा समावेश होता. “अशी देखील माहिती यावेळी त्यांनी दिली.
त्यासोबतच “केंद्रीय मंत्री अमित शहा, गजेंद्रसिंह शेखावत आणि धर्मेंद्र प्रधान यांनी माझे सरकार पाडण्याचा कट रचला. त्यांनी पैसे वाटले. आता ते पैसे परत घेत नाहीत. आमदारांकडून ते पैसे का मागत नाहीत, याचे आश्चर्य वाटते,“ असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तसेच “तुम्ही जे काही दहा कोटी, वीस कोटी रुपये घेतले असतील व त्यातील जे काही खर्च केले असतील ती रक्कम मी तुम्हाला देतो किंवा ती रक्कम मी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून घेऊन तुम्हाला देतो, ते पैसे त्यांना परत द्या, “असे आवाहनही गेहलोत यांनी आमदारांना केले. त्याच बरोबर “पक्षाने मला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम माझे आहे. जुने सर्व विसरून एकत्र या व विधानसभेच्या पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ या,“असे आवाहनही गेहलोत यांनी केले आहे.