जयपूर – आसामात निवडणूक निकालानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ नये म्हणून कॉंग्रेसने कमालीची सावधगिरी बाळगली असून त्यांनी आपल्या आघाडीच्या 22 उमेदवारांना आताच आसामातून राजस्थानातील एका रिसॉर्टमध्ये हलवले आहे. आता बहुधा निकाल लागेपर्यंत म्हणजे 2 मे पर्यंत तरी हे उमेदवार तिथेच राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
गोवा, मणिपूर अशा राज्यांमध्ये कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही या राज्यांमध्ये भाजपने फोडाफोडी करून तेथे सरकार स्थापन केल्याचा अनुभव ताजा आहे. तसेच कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांतील कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांनी तेथेही पराभूत होऊनही सत्ता मिळवली आहे. हा सारा प्रकार जमेला धरून कॉंग्रेसने आधीच ही सावधगिरी बाळगली आहे. आसामातील एकूण उमेदवारांपैकी या 22 जणांनाच येथे आणण्यात आले आहे. कारण ते कॉंग्रेसशी आघाडी करणाऱ्या पक्षांचे उमेदवार आहेत आणि त्यांना फोडणे भाजपला सोपे जाऊ शकते अशी या मागील अटकळ आहे. हे आमदार कॉंग्रेसप्रणीत महाज्योत म्हणजेच महाआघाडीतील एआयडीयूएफ, बोडोलॅंड पीपल्स पार्टी, डावे पक्ष आदी पक्षांचे आहेत.