संतोष कचरे
आंबेगाव बुद्रुक – राज्यात वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये गटबाजी झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले तर वर्षभरानंतर याच राजकीय खेळीची पुनरावृत्ती झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आमदारांसह बाहेर पडत अजित पवार शिंदे-फडणवीस (भाजप) सत्तेत सहभागी झाली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्येही शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. दोन पक्षाचे आता चार गट झाल्याने याचा परिणाम शहर, उपनगरांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर झाला आहे.
विशेष म्हणजे गटबाजीला उधाण आल्याने या गटातील पदाधिकाऱ्यांच्या दररोजच्या होणाऱ्या गाठीभेटीही कमी झाल्या आहेत. चर्चेतून होणारा विसंवाद आणि त्यातून वाढणारा राजकीय वाद नको म्हणून रोजच्या होणाऱ्या कट्टा बैठकाही बंद झाल्या आहेत. या राजकीय फोडाफोडीत सामान्य कार्यकर्ताही भरडला गेला आहे. तर, सामान्य नागरिकही राजकीय नेत्याकडे जाण्याचे टाळत आहे. काही निवडक कार्यकर्ते टीव्हीवर बातम्या बघत असल्याचे चित्र वगळता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची जनसंपर्क कार्यालयांत पूर्वी होणारी गर्दी आता ओसरली आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांचे महाविकास आघाडी सरकार 2019मध्ये आल्यानंतर ते टिकण्यासाठी जेवढे प्रयत्न झाले तेवढेच प्रयत्न ते पाडण्यासाठी सुरवातीपासूनच झाले. गेल्या तीन-चार वर्षांत विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ते शक्य झाले नाही. परंतु, लोकसभा 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “अब की बार पुन्हा मोदी सरकार’ आणण्यासाठी केंद्रातून महाविकास आघाडी सरकार पडण्याची “जय्यत’ तयारी केली गेली. सुरवातीला शिवसेना पक्षातून शिंदे बाहेर पडले तर वर्षभरानंतर अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले. यातून पक्षांत दोन गट पडल्याने त्यांनी आपली स्वत:च्या गटाची जनसंपर्क कार्यालये सुरू केली.
राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी दुसऱ्याच दिवशी स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटनही केले. यासह शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी आपापल्या गटाची स्वतंत्र कार्यकारिणीही केली. त्यामुळे राज्यभरात दोन पक्षांचे चार गट कार्यरत झाल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव अशा सर्वच पदांवर चार-चारच्या पटीत निवडी करण्यात आल्या आहेत.
काहींची जुनी पदे कायम असली तरी त्याच ठिकाणी त्याच पक्षाचा नवा पदाधिकारी नेमला गेला आहे त्यानेही तेथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागास शहर, उपनगरांत त्या-त्या भागात प्रत्येक पक्षाची दोन जनसंपर्क कार्यालये दिसू लागली आहेत. परंतु, अशा जुन्या आणि नव्या जनसंपर्क कार्यालयात पूर्वी होणारी प्रचंड गर्दी आता हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्त्यांवर आली आहे.
कार्यकर्त्यांचा संपर्क दोन्ही नेत्यांशी चांगला असल्याने एक गटाच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात जावून दुसऱ्या गटाची नाराजी ओढावून घेण्यापेक्षा न गेलेले बरे, अशा विचारातून कार्यकर्त्यांची रेलचेलही कमी झाली आहे. जो पर्यंत निवडणूका जाहीर होत नाहीत तोपर्यंत अवाढव्या खर्च करून मोठ्या दिमाखात तयार केलेली “कॉर्पोरेट’ कार्यालय गर्दीने बहरणार नाहीत, अशीच सध्याची स्थिती आहे.
इतर पक्ष सरसावले…
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गटबाजी झाल्यानंतर शहर, उपनगरांत इतर पक्ष सरसावले आहेत. कॉंग्रेस पक्ष अद्यापही महाविकास आघाडीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष, भारतीय राष्ट्र समिती-बीआरएस, आरपीआय यासह इतर आघाड्यांनीही आपल्या पक्षाच्या कार्यकारिणी नव्याने जाहीर करून अथवा रिक्त पदांवर नियुक्त करून आगामी निवडणुकांसाठी तयारी केली आहे. या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीही जनसंपर्क कार्यालये त्या-त्या ठिकाणी सुरू झाली आहेत.