मुंबई -भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या विसंगत वक्तव्यांवरून त्या पक्षाची बुधवारी शिवसेनेकडून खिल्ली उडवण्यात आली. महाराष्ट्रातील सरकार पाडता येत नसल्याने भाजपमध्ये गोंधळ उडालेला दिसतो, असे शिवसेनेने म्हटले.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचे म्हटले. त्यावर स्पष्टीकरण देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप किंवा शिवसेनेकडून पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव देण्यात आला नसल्याचे म्हटले.
भाजप नेत्यांनी मांडलेल्या वेगवेगळ्या भूमिकांचा आधार घेऊन शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून त्या पक्षावर निशाणा साधला. राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले तर राज्याचे हित अन्यथा नाही.
शिवसेनेला स्वार्थी, अपयशी अशी दूषणे नड्डा आणि फडणवीस यांच्याकडून दिली जात आहेत. मग, शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे काय साधणार? शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील आताची व्यवस्थाही राज्याच्या हिताचीच आहे. भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्या पक्षाने राहू नये, असा शाब्दिक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सरकार स्वार्थासाठी स्थापन झाले आहे. आपली कमाई करणे एवढाच त्यामागे हेतू आहे, अशी टीका नड्डा यांनी केली. पण, भाजपचे सध्याचे राजकारण कुठे परमार्थाचे लागून गेले आहे. पैशांचा वारेमाप वापर करून आवश्यक ते बहुमत विकत घेण्याचे प्रयत्न त्या पक्षाकडून केले जातात, असे म्हणत शिवसेनेने मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला.