नगर -महाराष्ट्र ही साधू संताची भूमी आहे. या भूमीमध्ये संतांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे प्रत्येक जण संकटाच्या काळामध्ये मदतीला धावून येण्याचे काम करतात. करोना संसर्ग विषाणूमुळे प्रत्येक नागरिक भयभित झाला असून, माणूस माणसाजवळ येण्यास घाबरत आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून रक्तदान शिबीराचे आयोजन न केल्यामुळे रक्ताचा तुतवडा भासत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकदिना निमित्त मराठा सेवा संघ व महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करून, समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे असे, प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकदिना निमित्त मराठा सेवा संघ व महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपमहापौर मालनताई ढोणे, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, सभागृह नेता स्वप्निल शिंदे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लता शेळके, उपायुक्त प्रदीप पठारे, नगरसेवक मनोज कोतकर, विनीत पाऊलबुध्दे, निखील वारे, बाळासाहेब पवार, शिवाजी चव्हाण, विजय गव्हाळे, शहर अभियंता सुरेश इथापे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश राजूरकर, यंत्र अभियंता परिमल निकम, रेश्मा आठरे, माया कोल्हे, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सुमित कुलकर्णी, पुष्कर कुलकर्णी उपस्थित होते.
महापौर वाकळे म्हणाले की, अधिकारी व कर्मचारी यांनी पुढे येवून रक्तदान शिबीराचे आयोजन करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला. आपली नोकरी व्यवसाय सांभाळून समाजा प्रती आपले देणे लागते या दृष्टिकोनातून प्रत्येकाने समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी आयुक्त मायकलवार म्हणाले, करोनाच्या संकटाच्या काळात प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शहरासाठी आपले योगदान दिले आहे. रक्तदान शिबीर हे नेहमीच काळाची गरज आहे असे ते म्हणाले.
यावेळी शहर अभियंता इथापे म्हणाले की, सर्वजण करोनानी भयभीत झाले आहेत. त्यामुळे समाजामध्ये रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणे संकटाच्या काळात सर्वांना मदत करावयाची आणि संकटातून बाहेर काढावयाचे या शिकवणीप्रमाणे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिना निमित्त मराठा सेवा संघ व अहमदनगर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे या शिबीरामध्ये सुमोर 300 रक्तदात्यांनी रक्तदान केले.