– योगेश मिश्र
प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता ना कोणता सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. वाईट सवयी सोडून द्यायला हव्यात. समाजाच्या हितासाठी काम करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
“बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा यंदाचा वाढदिवस एका निर्णयामुळे कायम स्मरणात राहील असाच आहे. कारण या दिवशी त्यांनी “कमला पसंद’ या पानमसाल्याची जाहिरात सोडत असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चनने फेसबुकवर एक पोस्ट केली. “एक घडी हाथ में क्या बांध ली, वक्त पीछे ही पड गया मेरे’. यावर एका यूजरने लिहिले की, “नमस्कार सर, मी एक गोष्ट विचारू इच्छित आहे.
असे काय झाले की, तुम्हाला कमला पसंद पान मसाल्याची जाहिरात करावी लागली.’ अमिताभ बच्चन यांनी त्यास उत्तर दिले की, “महोदय, क्षमा करा. कोणत्याही व्यवसायात एखाद्याचे भले होत असेल, तर आपण त्याच्याशी का जोडलो जात आहोत, याचा विचार करण्याची गरज नाही, पण खरंच व्यवसाय असेल तर त्यात आपल्याही व्यवसायाचा विचार करावा लागतो. तुम्हाला वाटत असेल की मी हे करायला नको होते, पण आम्हाला जाहिरातीतून पैसे मिळतात. आमच्या उद्योगातील खूप जण या क्षेत्रात काम करत आहेत.’
जेव्हा कलात्मक चित्रपटांचा जमाना संपला तेव्हापासून चित्रपटात कलाकार नाही तर हिरो तयार होऊ लागले. चित्रपट हा संदेश देण्यासाठी नाही तर मनोरंजनासाठी तयार होऊ लागले. कलेची जागा पैशाने घेतली. नायक नायिकांना यश हे त्यांच्या अभिनयातून नव्हे तर जीवनशैलीतून मिळू लागले. हे नायक आपले रोल मॉडेल बनले. चित्रपटातील सामाजिक मूल्यांची घसरण झाली.
दुसरीकडे ती जागा आर्थिक मूल्यांच्या रूपाने भरून निघाली. तेव्हापासून नायक नायिकांचे ध्येय हे चित्रपट न राहता कोणत्याही परिस्थितीत पैसे कमावणे हेच झाले. तेव्हापासून स्टेज शो आणि जाहिरातीकडे सर्वांनी मोर्चा वळवला. कलाकारांना चित्रपटाच्या तुलनेत जाहिरातीतून अधिक पैसे मिळू लागले.
मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान हा एक उत्पादन बाजारात आणण्यासाठीच्या प्रमोशनसाठी 11 कोटी रुपये घेतो. शाहरुख खान हा एका ब्रॅंडकडून 9 कोटी रुपये घेतो. सदर रेट लिस्टमध्ये अमिताभ बच्चन हे तिसऱ्या स्थानी आहेत. ते एका जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेतात. एका प्रमुख वर्तमानपत्राने नुकताच अहवाल प्रकाशित केला आहे. त्यांच्या मते, अक्षयकुमार 7 कोटी, सलमान खान 7 कोटी, विक्की कौशल 3 कोटी, टायगर श्रॉफ अडीच कोटी, आयुष्मान खुराणा दोन ते सव्वा दोन कोटी, राजकुमार राव दीड कोटी रुपये घेतो.
अशावेळी एखाद्या चाहत्याने केलेला प्रश्न त्यांच्या गळी कसा उतरू शकतो? केवळ चाहतेच नाही तर “नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर इरेडिकेशन ऑफ टोबॅको’ सारख्या स्वयंसेवी संघटनेने देखील अमिताभ बच्चन यांना आवाहन केले होते. यात म्हटले की, आपण सरकारच्या हाय प्रोफाइल पल्स पोलिओ मोहिमेचे ब्रॅंड ऍम्बेसीडर असताना पान मसाल्याची जाहिरात कशी करू शकता. ही जाहिरात सोडून द्यायला हवी, असे संस्थेच्या निवेदनात म्हटले होते. हा सल्ला केवळ अमिताभ बच्चन यांनाच नव्हे तर सर्वांनाच झोंबायला हवा.
अमिताभ बच्चन यांनी 80 व्या वर्षात पदार्पण केले आहे. अशावेळी त्यांना अचानक ही चांगली आठवण झाली असेल तर त्यावर कसा विश्वास ठेवायचा आणि का? ही जाहिरात सरोगेट (छुपी जाहिरात) होती, हे त्यांना ठाऊक नव्हते, असे म्हणणे मनाला कितपत पटते? सरोगेट जाहिरातीचा अर्थ असा की, आपण ज्या ब्रॅंडसाठी जाहिरात करत आहोत, त्या ब्रॅंडची अनेक उत्पादने बाजारात आहेत.
यात निर्बंध असलेल्या ब्रॅंडचा देखील समावेश होतो; परंतु मॉडेलचे चित्र किंवा व्हिडिओचा उपयोग हा निर्बंध नसलेल्या उत्पादनासाठी वापरला जातो. वास्तविक अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवरील चाहत्यास उत्तर दिले नसते तर लोकांनी ती जाहिरात सरोगेट असल्याचे मान्य केले असते. कारण “कमला पसंद’ पान मसाल्याकडून यापूर्वी अशा कुरापती झालेल्या आहेत.
ही गोष्ट जेम्स बॉंडपटातील प्रसिद्ध अभिनेता पिअर्स ब्रॉस्निन यांच्याशी निगडित आहे. जेव्हा त्याने
या कंपनीची जाहिरात केली, तेव्हाही काहूर माजले. पिअर्स ब्रॉस्निन यांनी आपण माउथ फ्रेशनरची जाहिरात करत असल्याचे सांगून वादाबाहेर राहण्याचा प्रयत्न केला, पण या जाहिरातीतील सत्य कळल्यानंतर त्यांनीही या जाहिरातीशी नाते तोडले; परंतु ही बाब अमिताभ बच्चन यांना लागू होत नाही. कारण प्रत्येक भारतीय नागरिकाला पान मसाल्याचा उद्योग ठाऊक आहे.
हा उद्योग तब्बल 42 हजार कोटी रुपयांचा आहे. यातील बहुतांश भाग उत्तर प्रदेशचा आहे. त्यामुळे दरमहा 130 कोटी महसूल उत्तर प्रदेश सरकारच्या तिजोरीत जमा होतो. एकट्या कानपूरमध्ये सुमारे 60 लाख पाउच दरमहा रिचवले जातात. भारतात दरवर्षी 12.80 लाख नागरिकांचा तंबाखूमुळे मृत्यू होतो.
बहुतांश मृत्यू हे तंबाखू खाणाऱ्यांमुळे झालेल्या आजाराने होतो. यात कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या पंधरा वर्षांत तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे गुटखा, तंबाखू, सिगारेटचे सेवन करणे होय. जागतिक प्रौढ तंबाखू
सर्वेक्षण-2 (2016-17) नुसार उत्तर प्रदेशात तंबाखू खाणाऱ्यांचा आकडा 2009-10 मध्ये तब्बल 33.9 टक्के होता. तो 2016-17 या काळात वाढून 35.5 टक्क्यांवर पोहोचला.
आता तो 49 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार तंबाखूचे सेवन करणारा प्रत्येक दुसरा व्यक्ती हा अकाली मृत्यूला सामोरे जातो. तंबाखूत 4 हजारांपेक्षा अधिक केमिकल्सचा समावेश असून त्याचा शरीराच्या विविध अवयवांवर नकारात्मक परिणाम होतो; परंतु अशा जाहिरातीसाठी केवळ अमिताभ यांनाच दोषी का धरायला हवे? अशा जाहिरात करणारी असंख्य सेलेब्रिटी असून ते याकडे लक्ष देत नाहीत. कारण त्यांना या उत्पादनाचा वापर करायचाच नसतो.
शेवटी प्रत्येक व्यक्ती हा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मोठा आणि सकारात्मक निर्णय घेत असतो. वाईट सवयी सोडून द्यायला हव्यात. सामाजिक कार्यात सहभाग वाढवायला हवा. यादृष्टीने अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाकडे पाहिल्यास पान मसाल्याची जाहिरात सोडण्याचा निर्णय हा स्मरणात राहणारा आहे;
परंतु त्यांनी मांडलेला तर्क हा कोणालाही फारसा पटणारा नाही. कारण त्यांनी सुरुवातीला व्यवसायाचा मुद्दा उपस्थित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे अंमली पदार्थप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला तुरुंगात डांबलेले असताना आताच जाहिरातीवरून राळ उठण्याची गरज काय, हे बिग बी चांगलेच जाणून असतील.