पूरस्थितीवर ‘सामना’तून भाष्य; “प्रफुल पटेल यांना गुजरात पॅटर्न….”, कर्जमाफीच्या प्रश्नावरून CM फडणवीसांवर बोचरी टीका

Saamana Editorial : महाराष्ट्रावरचे आभाळ फाटले आहे. त्यामुळे सरकारला मदतीसाठी खजिन्याची खिडकी उघडावी लागेल. विरोधी पक्ष काय करतोय? हा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न मूर्खपणाचा आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले?’ असा गुजरात पॅटर्न प्रश्न प्रफुल पटेल यांनी विचारला आहे.
ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती याचा विसर श्रीमंत प्रफुल पटेलांना पडलेला दिसतो, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर करण्यात आली आहे.
सीएम फडणवीसांना सवाल
नैसर्गिक आपत्तींचे राजकारण करू नये या मताचे आम्ही आहोत. अर्थात, अशाप्रसंगी राजकीय धूर सत्ताधारी असलेल्या पक्षाकडूनच सोडला जातो. मराठवाड्यात पूरपरिस्थिती पाहायला दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस पोहोचले. एका त्रस्त शेतकऱ्याने त्यांना ‘‘हेक्टरी किती नुकसान भरपाई देणार किंवा आता लगेच काय देताय ते सांगा’’ असे विचारताच मुख्यमंत्र्यांचा तोल गेला व त्या शेतकऱ्यावर भडकून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘अरे बाबा, गप्प बस. राजकारण करू नकोस.’’ आता नुकसान भरपाईची मागणी सर्वस्व गमावलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्याने करावी हे काय राजकारण झाले? असा सवाल करीत फडणवीसांना लक्ष्य केले.
शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे
इथे स्वतःचे दुःख, अन्याय मांडण्याचीही चोरी होऊन बसली. मराठवाड्यातील व अन्य जिह्यांतील पूरपरिस्थिती अभूतपूर्व अशीच आहे. या पुराचे राजकारण फक्त रिकामटेकडे किंवा ठेकेदारांच्या पैशांवर तरारलेले राजकारणीच करू शकतात. या जलप्रकोपात एक कोटीच्या वर शेतकरी फसले आहेत. शेती, घरे, गुरे वाहून गेली. मनुष्यहानी झालीच आहे. अशाप्रसंगी राजकारणाचा चिखल तुडवण्यापेक्षा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.
खुर्च्यांतले ढेकूण मारत बसायचे?
पूरग्रस्तांसाठी काय करता? असा उफराटा प्रश्न सरकारातील काही बिनडोक उपटसुंभांनी विरोधकांना केला आहे. पूरग्रस्तांना विरोधी पक्ष मदत करणार असेल तर सत्ता उबवणाऱ्यांनी काय त्यांच्या खुर्च्यांतले ढेकूण मारत बसायचे? असा सवालही उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत
विरोधी पक्षांचे कार्यकर्ते पूरग्रस्त भागात फिरतच आहेत, आपापल्या ते मदत करत आहेत. सरकार मात्र पुराच्या ठिकाणी आता पोहोचले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरपरिस्थितीच्या मदतकार्याच्या नियोजनाची सूत्रे हाती घेतली हे बरे झाले. मुख्यमंत्री स्वतः कार्यात उतरल्याशिवाय यंत्रणा वेगात हलत नाही, असे म्हणत फडणवीसांचे कौतुकही केले आहे. अग्रलेखातून पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
सरकारला मदतीसाठी खजिन्याची खिडकी उघडावी लागेल. विरोधी पक्ष काय करतोय? हा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न मूर्खपणाचा आहे. ‘सरकार पुरात वाहून गेले काय?’हा प्रश्न पूरग्रस्त शेतकरी कालपर्यंत विचारीत होते. असा सवाल करीत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.





