शेवगाव -नाफेड अंतर्गत कापूस खरेदी सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने नुकतीच दिली आहे. येत्या एक-दोन दिवसात तालुक्यातील खरेदी केंद्रावर ती सुरु होत असल्याने चापडगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर महिन्यापासून कापूस घालण्याच्या प्रतिक्षेत अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
करोनाला प्रतिबंध करण्यासाठी 23 मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील चापडगाव येथील नाफेडचे कापूस खरेदी केंद्र बंद झाले. तेव्हा तेथे कापूस घालण्यासाठी अनेक वाहने रांगेत उभी होती. खरेदी आजउद्या सुरू होईल या आशेवर ही वाहने तशीच रांगेत उभी होती. त्यातील अनेक वाहने भाडोत्री होती. शिवाय कडक उन्हाने कापसाचे वजनही घटत होते. शेतकऱ्याचे असे दुहेरी नुकसान होत असल्याने तो विवंचनेत होता.
दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन कालावधीत कृषी पुरक उद्योगांना केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून बाजार समितीसही शेतमालाच्या खरेदी विक्रीस परवानगी दिली आहे. त्यानुसार हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचा निर्णय राज्य सरकारने आता घेतला आहे. राज्याचे पणन सचिव अनुप कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन करोना या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही तसेच तेथील हमाल, शेतकरी, वाहनचालक व कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवा उपलब्ध करून कापूस खरेदीस परवानगी दिली आहे. यामुळे चापडगाव येथे अडकून पडलेल्या 100 हून अधिक शेतकऱ्यांची वाहने मोकळी होणार आहेत.
शेवगावातही कापूस हमीभाव खरेदी सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांना साठवलेला कापूस विक्रीकरता आणता येणार आहे. ही केंद्रे सुरू होण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजापुरे यांनी माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांचेमार्फत पालकमंत्री हसन मुश्रीफ, पणनमंत्री बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.