नवी दिल्ली – लखीमपूर खेरीला शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांना ठार मारण्याचा जो प्रकार झाला आहे तो नियोजनबद्ध कट होता असा निष्कर्ष विशेष चौकशी पथकाच्या अहवालात काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा यांचे वडिल व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करा अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केली होती. तोच धागा पकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला.
राऊत म्हणाले, उद्या संसदेचं अधिवेशन समाप्त होणार आहे. मात्र लखीमपूर खेरी येथील लढाई समाप्त होणार नाही. संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिलं, एका केंद्रीयमंत्र्यांच्या मुलाने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलं. पण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांनी हे पाहिलं नाही. एसआयटीचा अहवाल देखील आला आहे. बर एसआयटी तुम्ही बनवली. तरी तुम्हाला तो अहवाल मान्य नाही. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन विचारतात, राज्यात काय सुरू आहे. मात्र तुमच्या राज्यात तुमच्या नाकाखाली शेतकऱ्यांचे खून, हत्या होतायत. त्यावर तुम्ही काहीही कारवाई करत नाहीत, अशी टीका राऊत यांनी शहा यांच्यावर केली.
आमच्या कितीही खासदारांनी तुम्ही निलंबित करा. आज १२ खासदारांनी निलंबित कऱण्यात आलं आहे. उद्या ५० खासदारांनी निलंबित करा. तरी विरोधकांची एकत्र येऊन सरकारला प्रश्न विचारणं बद करणार नाहीत, असा इशाराही राऊत यांनी मोदी सरकारला दिला. तसेच कॅबिनेटमधील हत्यारांना बाहेर काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचं, राऊत यांनी म्हटलं.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे विरोधकांकडून आभार व्यक्त करतो. राहूल आणि प्रियंका त्यावेळी लखीमपूर खेरी य़ेथे गेले नसते, तर हे प्रकरण तिथच दाबल असत, असंही राऊत यांनी म्हटलं.