मिरी-तिसगाव व बुऱ्हाणनगर पाणी योजनांची वसुली न झाल्यास सरपंचांवर कारवाई
नगर – जिल्हा परिषदेत सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून आमदार मोनिका राजळे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कोंडी करण्याचा घाट घातला जात आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी- तिसगाव व नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर या दोन्ही पाणीयोजनांची पाणीपट्टी वसुलीवर भर देण्यात आला असून या दोन्ही पाणीयोजनांची शंभर टक्के वसुली करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे.
वसुली न झाल्यास या योजनांचा लाभ घेणाऱ्या सरपंचांसह ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत केवळ या दोन पाणीयोजनांवर चर्चा झाली. मिरी-तिसगाव व बुऱ्हाणनगर पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसुली होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून वसुली गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तातडीने करण्याचे सांगण्यात आले.
या सर्व गावांमध्ये वॉटर मिटर बसविण्याची जबाबदारी उपअभियंता व गटविकास अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली असून या दोन्ही पाणीयोजनांची शंभर टक्के वसुली न झाल्यास संबंधित गावाचे सरपंच, ग्रामसेवक, उपअभियंता व गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे.
महानेटचे ग्रामपंचायत जोडो कार्यक्रमांतर्गत रस्ते खोदाई होत आहे. हे रस्ते रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर अंतरावर खोदकाम करणे अपेक्षित आहे. परंतु तसे न करता रस्त्याच्या तसेच साईटपट्ट्या खोदुन व जेथे जागा नाही तेथे डांबरी रस्ते फोडून खोदकाम करण्यात आले आहे. तसेच हे खोदकाम करतांना झाडे देखील तोडण्यात आले आहे.
त्यामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून त्याची नुकसान भरपाई संबंधिताकडून घेण्यात यावे. यासाठी उपअभियंत्यांनी रस्त्यांची पाहणी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश या बैठकीत घुले यांनी दिले.
करोनो व्हायरसमुळे यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची इस्त्रोची सहल पुढे ढकल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती काशिनाथ दाते, सुनील गडाख, मिरा शेटे, सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, सदाशिव पाचपुते, अनिता हराळ मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.