Satara | आ. गोरेंना १५ वर्षात जनतेचे दुःख समजले नाही हे दुर्दैव

दहिवडी, (प्रतिनिधी) – धैर्यशील मोहिते-पाटील यांना खासदार होवून फक्त दोन महिनेच झालेत. दोन महिन्यात त्यांना जनतेचं दुःख समजलंय. मात्र, पंधरा वर्षे आमदार असलेल्या माणसाला हे समजलं नाही हे दुर्दैव आहे.
खरंतर खासदारांना नाही तर झोपी गेलेल्या तुम्हालाच जागे होण्याची, आत्मपरीक्षणाची गरज आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.
दहिवडी येथे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, भालचंद्र कदम, अॅड. संतोष पवार, हर्षदा देशमुख-जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, माण-खटावला २००९ पुर्वी जेवढं पाणी मिळालं त्यातील तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतोय. आपल्या हक्काचं दोन हिस्से पाणी सांगली व सोलापूरला जातंय. ९७ साली जिहे-कटापुर योजना मंजूर झाली.
पाण्याचं आरक्षण झालं. पाणी यायला मात्र एवढी वर्षे लागली. खरंतर दुष्काळी कालावधी आंधळी धरणात हे पाणी आले असताना माण नदीत सोडणं आवश्यक होतं. दुर्दैवाने हे पाणी नदीत सोडलं नाही. त्यामुळे ना दुष्काळाची दाहकता कमी झाली ना लोकांचे अश्रू थांबले. त्यांनी पाणी न सोडण्याचं पाप केल्यामुळे लोकांची पिके जळाली.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, जिहे-कटापुरचे पाणी येरळवाडी धरणात सुध्दा जाते. धरणात पाणी यावे, तिथले बंधारे भरावेत यासाठी मोठा संघर्ष राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्वच पक्षांनी केला.
यानंतर जिहे-कटापुरचे पाणी कोरेगाव मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत सोडले गेले. पण माण मतदारसंघाच्या हद्दीत सोडले नाही. हा दुजाभाव का करण्यात आला? हे पाणी न सोडायला कोण जबाबदार आहे? हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. हे पाणी जर सोडले असते तर शेतकर्यांची उभी पिके वाचली असती.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, २०१९ च्या निवडणूकीवेळी बिजवडी येथे आमदारांनी सहा महिन्यात पाणी इकडे आले नाही तर राजीनामा देईन असं जाहीर केलं होतं. त्यावेळी ज्याचं भूमिपूजन झालं त्याच प्रकल्पाचं पुन्हा एकदा भूमिपूजन झालं. सहा महिन्यात सोडा पाच वर्षांत ते पाणी आलं नाही आणि आता ते पाणी पुढच्या पाच वर्षांत या भागात फिरेल हे सांगण्यात येतंय हे माण तालुक्याचं दुर्दैव आहे.
पाणी हिंगणीपर्यंत कधी येणार आहे?
पाणी आणायचं असतं तर फाकड्याने पंधरा वर्षात जिहे-कटापुरचं पाणी माण नदीत सोडलं असतं. पण ते सोडलेलं नाही. आता ते पाणी हिंगणीपर्यंत कधी येणार आहे? वितरण व्यवस्था कशी होणार आहे? याच्याबद्दल आजही काही सांगण्यात आलेलं नाही. आता गावोगावी सर्व्हेसाठी माणसं हिंडत आहेत.
हा सर्व्हे मागील पाच वर्षांपूर्वी का झाला नाही? त्याला पंधरा वर्षे का लागली? खासदारांना दौर्यादरम्यान शेतकर्यांनी ज्या अडचणी सांगितल्या, त्या सोडविण्यासाठी त्यांनी बैठक घेतली, सुचना केल्या. खासदारांनी दोन महिन्यात जे काम केलंय त्याबद्दल राजकारणापलीकडे जावून त्यांना धन्यवाद दिलं पाहिजेत.





