गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे : मधुकरराव पिचड

अकोले (प्रतिनिधी) –अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी केले.
अगस्तीचा 26 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ योगी केशव बाबा चौधरी व मान्यवरांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर योगी केशव बाबा चौधरी, माजी मंत्री मधुकरराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व इतर मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगाम सुरू करण्यात आला. तेव्हा अध्यक्षपदावरून पिचड बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, बाळासाहेब गाढवे, साईनाथ करमाळे, गणेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
गतवर्षी रॉ शुगर काढून कारखान्याला आपण सुरुवात केली. याही वर्षी तेच काम करावे लागेल, याकडे लक्ष वेधून पिचड म्हणाले, या वर्षीच्या गळीत हंगामासाठी अनेक आव्हाने उभी आहेत. त्यात पावसाने सर्वच शिवार रस्ते खराब केल्याने व शेतातील उसामध्ये पाणी असल्याने गळीत हंगामाचे मोठे आव्हान सर्वांना पेलावे लागणार आहे. रिकव्हरी कमी राहणार असून, त्या दृष्टीने आपण गळीत हंगामासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नेवासा, गंगापूर, निफाड, राहुरी व नाशिक या ठिकाणांवरून ऊस आणला जातो, असा संदर्भ देऊन पिचड म्हणाले, गंगापूरहून अधिक टोळ्यांची मागणी झाल्यामुळे तेथे त्यादृष्टीने सहकार्य केले जाईल. शिवाय तालुक्यातील व तालुक्याबाहेर कष्टाळू शेतकऱ्यांना निश्चितच मदत केली जाईल. सर्वांचा ऊस गळीतासाठी कारखान्यावर आणला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ऊसतोड कामगार, ट्रक मालक, मुकादम, कारखाना कामगार या सर्वांच्या भिस्तीवर गळीत हंगाम यशस्वी करावयाचा असून, त्यादृष्टीने सर्वांनी कारखान्याला शेतकरी हिताची जपणूक करण्यास सहकार्य करावे, असे सांगून गतवर्षी गाळप क्षमता वाढवली. ती अपुरी पडल्यास प्रसंगी त्यातही वाढ केली जाईल, अशी हमी त्यांनी या वेळी दिली.
कारखान्याचे उपाध्यक्ष गायकर यांनी गळीत हंगामाच्या तयारीविषयी माहिती दिली. गतवर्षी पाच लाख 76 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. यावर्षी कार्यक्षेत्रातील अडीच लाख व बाहेरील अडीच लाख मिळून पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे नियोजन केलेले असल्याचेही त्यांनी सांगिले.
अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, ऊस उत्पादक शेतकरी साईनाथ तरमाळे, गणेश चव्हाण आदींची यावेळी भाषणे झाली. स्वागत संचालक अशोकराव देशमुख यांनी केले. प्रास्ताविक संचालक महेश नवले यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव शेटे यांनी केले. संचालक बाळासाहेब ताजणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, गिरजाजी जाधव, एस. पी. देशमुख, प्रदीप हासे, बाळासाहेब कोटकर, प्रमोद मंडलिक, भाऊसाहेब रकटे, किसन लहामगे, पंचायत समिती सदस्य नामदेव आंबरे, भाऊपाटील नवले, शांताराम वाळुंज उपस्थित होते. कारखान्याचे संचालक व माजी आमदार वैभव पिचड यांची अनुपस्थिती यावेळी प्रकर्षाने जाणवली.





