मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात देश थंडीने कुडकुडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, येणारे आणखी काही दिवस देशात थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. थंडीच्या तडाख्याने राज्यालाही चांगलीच हुडहुडी भरली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे वर्षाचा पहिलाच दिवस गारेगार गेला तर पुढचा आठवडाभर थंडी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईत 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी मुंबईचे तापमान हे 15.6 अंश सेल्सिएस नोंदवण्यात आले. तर माथेरानमध्येही 15 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये 11 ते 12 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर पश्चिम भारतातील मोठ्या भागात थंडीची लाट पसरली आहे.
येत्या तीन दिवसांत उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या वेगळ्या भागांमध्ये पुढील दोन दिवस थंडीची लाट पसरण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य भारतातील मैदानी भागात हिमालयातून येणाऱ्या वायव्य वाऱ्यांमुळे येत्या दोन दिवसांत वायव्य आणि लगतच्या मध्य भारतातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. यामुळे मंगळवारपर्यंत राजस्थानच्या उत्तर भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात थंडीच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला होता.