राज्यावर भारनियमनाचे संकट : वीज निर्मितीसाठी केवळ 5.78 टीएमसी पाणीसाठा
सूर्यकांत पाटणकर
पोफळी टप्पा एक व दोनमधून 1014.070 दशलक्ष युनिट कोळकेवाडी वीजगृहातून 826.526 दशलक्ष युनिट व टप्पा क्रमांक चारमधून 1159.726 दशलक्ष युनिट अशी वीजनिर्मिती झाली आहे. पायथा वीजगृहातून 188.580 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.
यावर्षी कोयनाधरण व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे 3.90 टीएमसी पाणी वीजनिमिर्ती न करताच नदी विमोचकातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यावर कोणतीही वीजनिमिर्ती केली गेली नाही. धरणाच्या भिंतीच्या मध्यभागी आसणारे नदी विमोचक 13 मार्च सुरू केले. त्यानंतर 4 एप्रिलला बंद केले पुन्हा 13 एप्रिलला चालू केले ते आजपर्यंत चालू आहे. या नदी विमोचकातून तब्बल 3.90 टीएमसी पाणी नदीपत्रात मोकळे सोडण्यात आले आहे.
पाटण – महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने राज्यापुढे वीज निर्मितीचे संकट ओढवले आहे. राज्यापुढे दुष्काळाची स्थिती गंभीर असताना कोयना धरणातून सतत पाणी सोडणे सुरू आहे. धरणात आजआखेर 22.39 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून पश्चिमेकडील वीज निमिर्तीसाठी धरणात केवळ 5.78 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने कोणत्याही क्षणी कोयनेची वीजनिमिर्ती ठप्प होऊन राज्यावर भारनियमनाचे संकट ओढवू शकते.
महाराष्ट्र राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांची विजेची सिंचनाची तहान भागविणाऱ्या कोयना धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणात 22.39 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर मृत पाणीसाठा 5.12 टीएमसी आहे. पूर्वेकडील सिंचनासाठी 38 टीएमसी पाणीसाठा वापरला आहे. कोयनाधरण व्यवस्थापनाने यावर्षी पूर्वेकडे सिंचन व पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी अखंडपणे पाणी सोडण्यात आले. मात्र कृष्णा लवादानुसार सांगली पाटबंधारेला दिले जाणारे अतिरिक्त पाणी व दुष्काळी गावांची तहान भागविण्यासाठी होणारी मागणी यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणातील 67.5 टीएमसी पाणी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. तर पूर्वेकडील सिंचनासाठी 29 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात येतो. चालूवर्षी पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी आजपर्यंत 59.69 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. तर पूर्वेकडील सिंचनासाठी अद्याप धरणात 9.45 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मेअखेर हा पाणीसाठा संपून राज्यापुढे पाण्याचे संकट उभे राहणार आहे.
यावर्षी लवादानुसार पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी केवळ 5.78 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीजनिर्मिती व सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कोयनाधरण व्यवस्थापनाला भेडसावणार आहे. शासनाने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावे जाहीर केली आहेत. त्या गावांसाठी अतिरिक्त पाण्याची मागणी केल्याने पायथा वीजगृहातून 2000 क्युसेक्स नदी विमोचकातून 1000 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
कोयनाधरण व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार पश्चिमेकडील वीजनिमिर्ती व पूर्वेकडील सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र पूर्वेकडील सिंचनासाठी अतिरिक्त पाण्याची मागणी केल्याने पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी लागणारा पाणीसाठा शिल्लक ठेवून पूर्वेकडे पायथा वीजगृहातून वीजनिमिर्ती करून पाणी सोडण्यात येते. गतवर्षीच्या परतीच्या पावसाने पाठ फिरविली होती.
यावर्षीही पूणे वेधशाळेने संपूर्ण जून महिना कोरडा जाणार असल्याचे अंदाज कोयनाधरण व्यवस्थापणाला कळवला आहे. 1 जून ते 30 मे असे कोयना धरणाचे जलवर्ष असते. त्यामुळे जलवर्ष संपण्यासाठी केवळ नऊ दिवस बाकी राहिले आहेत. या नऊ दिवसात पुर्वेकडील सिंचनासाठी केवळ 9.45 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहेत. तर वीज निमिर्तीसाठी केवळ 5.78 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने कोणत्याही क्षणी वीजनिर्मिती ठप्प होवून राज्यापुढे वीजनिमिर्तीचे संकट निर्माण होणार आहे.
संपूर्ण जून महिन्यासाठी कोयना धरणात 5 टीएमसी पाणीसाठा ठेवण्याचे आमचे नियोजन आहे. त्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी 5 टीएमसी हा पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र वीजनिर्मितीचा शिल्लक असणारा 5.78 टीएमसी पाणीसाठा संपल्यास कोयना धरणातून वीजनिर्मिती बंद होऊ शकते.
वैशाली नारकर , अधिक्षक अभियंता, कोयना सिंचन मंडळ सातारा