पुणे – हवेतील वाढलेला गारवा, सकाळच्या कोवळ्या उन्हाऐवजी असलेले ढगाळ वातावरण, पाऊस या वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे. सर्दी, खोकला, कफ, ताप, घशाच्या संबंधित समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. रात्री कडाक्याची थंडी, सकाळी पाऊस आणि दुपारी ऊन असते. दिवसभरात असे तिन्ही ऋतू पुणेकरांना सध्या अनुभवायला मिळत आहेत. या वातावरण बदलाचा परिणाम थेट प्रकृतीवर होत आहे.
साथरोगांना ते निमंत्रण देणारे ठरत आहे. विशेषत: दम्याचा आजार किंवा श्वसनासंबंधिचे आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. याशिवाय, करोनाकाळात ज्या व्यक्तींना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लावले होते, त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
“पोस्ट कोविड’ लक्षणांमुळे आधीच त्यांच्या प्रकृतीला बऱ्यापैकी धोका असतोच, त्यातून वातावरण बदलाचा परिणाम जिवावर बेतणारा ठरू शकतो. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.