मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज पुराव्या अभावी सीबीआयने क्लीनचिट दिली असल्याचा दावा एका कागदपत्राद्वारे करण्यात आला आहे. ही कागदपत्रे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र अद्याप यासंदर्भात कोणताही दुजोरा मिळाला नसला तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. आमदार रोहित पवार यांनी यावर भाष्य केले आहे. ‘सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकलं जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं!’ असे पवार यांनी ट्विट केले आहे.
रोहित पवार म्हणाले की, ”सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकलं जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं! यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.”
कॉंग्रेसनेही दिली प्रतिक्रिया
अशी षड्यंत्रे फक्त हुकुमशाहीत घडतात. लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येण्याची वेळ आली आहे. जाहीर निषेध!
अनिल देशमुख आणि मविआ ला बदनाम करण्याचे मोदी सरकारचे षड्यंत्र उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीत सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने असा निष्कर्ष काढला होता की परमबीर सिंह यांनी केलेल्या तथाकथित ₹१०० कोटी वसूली आरोपात अनिल देशमुख जी यांची कोणतीही भूमिका नाही आणि चौकशी बंद केली होती.
तपास अधिकाऱ्याच्या अहवालाला बाजूला सारून सीबीआयने भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर बदलली हे शोधण्यासाठी या षडयंत्राची सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन चौकशी व्हावी. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशी करा असे सांगितले असताना न्यायालयाची दिशाभूल करून FIR नोंदवणे हा CBI चा मोठा गुन्हा आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे या यंत्रणा मोदी सरकारच्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी राजकीय शस्त्र कसे बनतात याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. न्यायालयाची दिशाभूल केली जाते, नियम गुंडाळले जातात, चौकशा अंतहीन ठेवल्या जातात. अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.