“क्षीरसागर’च्या परीक्षार्थींचे मनावरील मळभ गेले
भिगवण – येथील कोंडीराम सदाशिव क्षीरसागर विद्यालयात दहावीच्या परिक्षार्थींचे गुलाब पुष्प देउन स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा राज्यभरात मंगळवार (दि. 3) पासून सुरु झाल्या. पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांचे मनावरील दडपणाचे मळभ निघून गेले. क्षीरसागर माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर एकूण 557 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.
यामध्ये पुणे, सोलापूर, आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा आणि कर्जत तालुक्यातील विद्यार्थी आहेत. त्यामध्ये सरस्वती विद्यालय रावणगाव, भैरवनाथ विद्यालय खडकी, त्रिमूर्ती विद्यालय, टाकळी, जयप्रकाश नारायण विद्यालय, खेड नगर, श्रीराम विद्यालय स्वामी चिंचोली, राजेश्वर विद्यालय राजेगाव, शहाजीराव उमाजीराव राजेभोसले विद्यालय, जिंती आणि क्षीरसागर विद्यालय, भिगवण या विद्यालयातील विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिक्षा केंद्रावर कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून बैठेस्कॉड आणि अंतर्गत भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, प्राचार्य तुषार क्षीरसागर, आण्णासाहेब धवडे, अविनाश गायकवाड, शिवाजी देवकाते,पराग चौधरी, केंद्र उपसंचालक सचिन कांबळे, योगेश हगारे, केंद्र संचालक विनोद गवळी, पालक व शिक्षक यावेळी उपस्थित होते.