पुणे – जातपंचायतीऐवजी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केल्याने मागील पावणे तीन वर्षापासून वाकड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबास सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर जात पंचायतीच्या 13 जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिताराम कृष्णा सागरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार करेप्पा मारुती वाघमारे, बाजीराव वाघमारे, साहेबराव वाघमारे, मोहन शामराव उभाडे, मनोज सागरे, विजय सागरे, रामदास भोरे, अमर भोरे, महादेव भोरे, मारुती वाघमारे, विष्णू वाघमारे, अमृत भोरे, गोविंद भोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
सीताराम सागरे यांचा जानेवारीमध्ये शितल भोरे यांच्याशी विवाह झाला. मार्चमध्ये कौटुंबिक वादातून शितल माहेरी निघून गेली. त्यानंतर पत्नीने अलिप्त होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. परंतु, याबाबत माहिती मिळताच जात पंचायतीऐवजी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केल्याने सागरे कुटुंबियांवर जातपंचायतीच्या हुकमावरून समाजातून त्यांना बहिष्कृत करण्यात आले.
पंचायतीत मुलीचे आजोबा, मामा
जातपंचायतीचे पाटील व पंच म्हणून मुलीचे आजोबा, मामा हे काम पाहत असून त्यांनीही मुलीस बहिष्कृत केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. सागरे कुटुंबियांशी कुणी संबंध ठेवू नये, ठेवल्यास त्यांना वाळीत टाकू असे फर्मान जातपंचायतीने काढले आहे. त्यामुळे सागरे कुटुंबियांना समाजातील, नात्यातील सुखदुखाच्या प्रसंगात सहभागी करून घेतले जात नसून त्यांना कार्यक्रमांना येऊ दिले जात नाही.
याबाबत सागरे कुटुंबियांनी जातपंचायतीस जाब विचारला असता, त्यांनी स्वत:चे कृत्य योग्य असल्याचे सांगत मारहाण केल्याचा प्रकारही घडला आहे. याप्रकरणी जात पंचायतीचे सदस्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी “अंनिस’च्यावतीने विशाल पोखरकर यांनी केली आहे.