पुणे – सध्या रेल्वे बंद असल्याचे समजून अनेक नागरिक रुळांवरून चालत गावी जात आहेत. परंतु, रेल्वे रुळ किंवा त्याच्या आसपास वावरणे धोकादायक असल्याने नागरिकांनी रुळांचा उपयोग करून ये-जा करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांना घरी सोडण्यासाठी भारतीय रेल्वेकडून विविध भागांमध्ये अडकलेले कामगार, विद्यार्थी, पर्यटक आदींना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. परंतु, अनेक नागरिक अंतर कापले जावे, वेळेची बचत व्हावी, रुळांवरून जाताना पोलीस थांबवणार नाहीत आदी कारणांमुळे रुळांवरून चालत प्रवास करत आहेत.
रेल्वेच्या प्रवासी गाड्या स्थगित केल्या आहेत. मात्र विशेष गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळांवरून चालू नये, रुळांवर थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सतर्कतेमुळे टळला अपघात
औरंगाबादमध्ये रेल्वेखाली येऊन 16 जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती मागील आठवड्यामध्ये पुणे विभागामध्ये टळली. उरुळी आणि लोणी स्थानकांदरम्यान काही नागरिक रेल्वे रुळांवरून चालत होते. याच दरम्यान उरूळीहून पुण्याच्या दिशेने शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मालगाडी येत होती. या मालगाडीच्या चालकाला हे दिसताक्षणी चालकाने हॉर्न वाजवून गाडीचे इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली. यामुळे मालगाडी या लोकांपासून 100 मीटर दूर थांबवली.