शिराळा : बिऊर (ता शिराळा) च्या अमृतनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील (वय ६) या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दिनांक ३० जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला अनेक वेळा फोन केला तरीही कुणीही फोन उचलला नव्हते. त्या कारणाने संतप्त नागरिकांनी हजारोच्या जमावाने वन विभागाचे कार्यालय फोडले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राजवीर व त्याची लहान बहीण कार्तिकी (वय ४) आपल्या घरातून शेजारी घरात खेळत जात असताना अचानक बिबट्याने राजवीरवर हल्ला केला. त्यावेळी सोबत असणारी बहीण ओरडल्याने घरातील लोक व नागरिक जमा झाले. तोपर्यंत बिबट्याने राजवीरला गळ्याला धरून सुमारे पाचशे फुटावर शंकर केरु पाटील यांच्या शेतापर्यंत फरफटत नेले. त्यावेळी पंडित शंकर पाटील, बजरंग पांडुरंग पाटील, शशिकांत पाटील, कृष्णात पाटील, महादेव भीमराव पाटील, पोपट पाटील, राजू शंकर पाटील, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, अक्षय पाटील यांनी बिबट्याचा पाठलाग केला. ओढ्यालगत राजवीरचे चुलत आजोबा शंकर श्रीपती पाटील यानी बॅटरीच्या झोतात पाहिले. त्यावेळी राजवीर जख्मी अवस्थेत आढळून आला. या काळात तिथून बिबट्याने धूम ठोकली होती. जखमी राजवीरला शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन डॉ. दीपक बनसोडे यांनी केले. राजवीर मृत झाल्याने जमाव संतप्त झाला होता. त्यातच वनविभागाचे कर्मचारी फोन उचलत नव्हते. त्यामुळे जमावाने वन विभागाचे भुईकोट किल्ला परिसरात असणारे कार्यालय फोडले. त्यामध्ये जमावाने कार्यालयाचे दार, खिडक्या फोडल्या. तसेच लोखंडी गेट ही उपसून फेकून दिले. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर नाईक, रेणुकादेवी देशमुख, सम्राट नाईक, विराज नाईक, सत्यजित नाईक, तहसीलदार श्यामला खोत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, साई तेजस्वी देशमुख, सुखदेव पाटील, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, भूषण नाईक, विश्वास कदम, बंटी नांगरे पाटील उपस्थित होते. समजूतीनंतर जमाव शांत झाला सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, उपवनसंरक्षण सागर गवते, प्रांतधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी रात्री ११ वाजता उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत आमदार सत्यजित देशमुख, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मनसिंगराव नाईक, तहसीलदार शामला खोत रुग्णालयात बसून होते. पोलिस यंत्रणा प्रयत्न करीत होती. मात्र संतप्त जमाव शांत होत नव्हता. अखेर अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी समजूत काढल्याने रात्री पावणे बारानंतर शवविच्छेदनास परवानगी देण्यात आली. त्यानंतर रात्री १२ वाजता जमाव पांगला. २) वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्यासह शिराळा कार्यालयातील सर्व वन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव नागपूरला पाठवला आहे. त्याला सोमवारपर्यंत मंजुरी मिळेल, असे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सर्व प्रक्षोभक ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजवीरच्या शव विच्छेदनासाठी अनुमती दिली. ३) हल्ला केलेला बिबट्या चौथ्यांदा सव्वानऊच्या दरम्यान याच परिसरात आला. यामुळे नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हेही वाचा : Sunil Tatkare : शरद पवारांंचा विलीनकरणाचा गौप्यस्फोट; सुनील तटकरेंची एकाच वाक्यात प्रतिक्रिया