मुंबई – मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाची 24 लाख 56 हजार 469 रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला डिफॉल्टर म्हणून घोषित केला आहे. यामुळे सामान्य मुंबईकरांसाप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरही कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 24 लाख 56 हजार 469 रुपयांची थकबाकी थकली असल्याने मुंबई महापालिकेने पाणीपट्टी न भरणाऱ्या या बंगल्यांना डिफॉल्टरच्या यादीत टाकले असल्याची ही माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.
‘या’ मंत्र्यांनी थकवली पाणीपट्टी
माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जामंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयलस्टोन, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मेघदूत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुरातन, मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या शिवगिरी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जेतवन, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या चित्रकुट, मंत्री राजेश शिंगणे यांच्या सातपुडा, नवाब मलिक यांच्या मुक्तागिरी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक आणि सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अजंठा तसेच सह्याद्री अतिथी गृहाची पाणीपट्टी थकली आहे.
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर हाही बंगला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर म्हणून घोषित केला आहे.