नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार विमानतळावर उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले. तसेच, कॉंग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्धही रंगले. मात्र, सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या अनुपस्थितीचे कारण स्वत: मोदींनीच स्पष्ट केले.
मागील काही दिवस मोदी परदेश दौऱ्यावर होते. ते शुक्रवारी ग्रीसमध्ये होते. तिथून त्यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेण्यासाठी थेट बंगळुरू गाठले. शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मोदींचे विमान बंगळुरू विमानतळावर दाखल झाले. पंतप्रधान कर्नाटकच्या राजधानीत पोहचल्याने शिष्टाचारानुसार त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही.
खरेतर, मोदींच्या स्वागतासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार उपस्थित राहणार नसल्याची कल्पना आधीच आली. त्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी शुक्रवारी केलेला आरोप कारणीभूत ठरला. मोदींच्या आधीच सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा सत्कार केला. त्यामुळे बहुधा संतापलेल्या मोदींनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना स्वागतासाठी येण्यास मनाई केली, असे रमेश यांनी म्हटले. दुसरीकडे शिवकुमार आणि कर्नाटकमधील भाजपचे नेते आर.अशोक यांच्यातही जुंपली. कॉंग्रेस नेत्यांना शिष्टाचाराचे कुठले ज्ञान नाही. ते मतांसाठी राजकारण करतात, असा आरोप अशोक यांनी केला. त्यावर शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही स्वागतासाठी येऊ नये अशी औपचारिक सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. कॉंग्रेसची समज सर्वच बाबतीत भाजपपेक्षा चांगली आहे, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.
बहुधा, वादाची माहिती मिळाल्याने मोदींनीच तो संपुष्टात आणण्यासाठी वस्तुस्थिती नमूद केली. मी खूप दूरवरून येत असल्याने बंगळुरूमध्ये निश्चित केव्हा पोहचणार याची माहिती नव्हती. त्यामुळे राज्यपाल थावरचंद गेहलोत, सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना मी त्रास देऊ इच्छित नव्हतो. त्यामुळे मीच त्यांना स्वागतासाठी न येण्याची विनंती केली. सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे मोदी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना म्हणाले.