Chhatrapati Sambhajinagar : हृदयद्रावक ! 3 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी येथील तलावात शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत तीन निष्पाप अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथे राहणारे (Chhatrapati Sambhajinagar) पाच मित्र शनिवारी सायंकाळी देवळाई तांडा येथील साई टेकडी परिसरातील तलावावर पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि पोहत असताना अचानक तोल गेल्याने ही पाचही मुले पाण्यात बुडू लागली आणि अडचणीत सापडली.
दोन मुलांना जीवदान, तिघांचा अंत
पाण्यात बुडत असताना दोन मुलांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवला आणि ते सुखरूप बाहेर आले. मात्र, दुर्दैवाने इतर तीन मुले खोल पाण्यात अडकली आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक मोहित त्रिवेदी यांनी तात्काळ अग्निशमन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून पद्मपुरा मुख्य अग्निशमन केंद्र आणि कांचनवाडी अग्निशमन केंद्राचे मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात युद्धपातळीवर (Chhatrapati Sambhajinagar) शोधमोहीम राबवून तिन्ही मुलांना बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. जवानांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढून चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. मृत मुलांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
विशाल मच्छिंद्र घुले (वय १५ वर्षे)
आदर्श गौतम इंगोले (वय १५ वर्षे)
यश ज्ञानेश्वर बरंबाईल (वय १६ वर्षे)
हे तिन्ही मृत मुलगे सातारा परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी होते. अवघ्या १५ ते १६ वर्ष वयोगटातील या मुलांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






