Chemically Ripened Mangoes – ओतूर, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर आणि बेल्हे परिसरातील बाजारपेठांमध्ये सध्या आंब्यांचा हंगाम जोरात असला तरी, कृत्रिम पद्धतीने पिकवलेले आंबे विक्रीस येत असल्याचे कडू वास्तव समोर आले आहे. आकर्षक पिवळा रंग आणि चमकदार सालीचे आमिष दाखवून बंदी असलेल्या कॅल्शियम कार्बाइड व इथ्रिलसारख्या घातक रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात आहेत. नैसर्गिक प्रक्रियेला ७ ते १० दिवस लागत असताना रसायनांमुळे ही प्रक्रिया केवळ २ ते ३ दिवसांत पूर्ण केली जात असल्याने आंब्यांची गुणवत्ता आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे केमिकलयुक्त आंबे बाह्यरूप पाहून हापूस, केशर किंवा पायरीच्या नावाखाली ७०० ते ११०० रुपये डझन दराने विकले जात असून ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. प्रत्यक्षात हे आंबे आतून चवहीन किंवा कच्चे असतात आणि लवकर खराब होतात. असे आंबे खाल्ल्यामुळे उलटी, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी आणि घशात जळजळ होण्यासारखे गंभीर त्रास उद्भवू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत असून नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबेच खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे.