प्रभात वृत्तसेवा रांजणी – आधीच अतिवृष्टी झालेली. त्यात बाजारभावातील अनिश्चितता आणि आता रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. खतांमध्ये प्रतिबॅग 200 ते 300 रुपये दर वाढ झाली आहे. विविध मिश्र खतांचे दर तर गगनाला भिडले आहेत, अशातच लिंकिंग सुरू आहे. परंतु शेतमालाचे भाव अजूनही पाहिजे तसे वाढलेले नाहीत त्यामुळे आंबेगाव तालुक्यात रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्याने खत दरवाढीचे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. कांदा,बटाटा, सोयाबीन तसेच इतर भाजीपाला अशा प्रमुख पिकांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हंगामाचा हिशोब जुळवणे कठीण झाल्याची दिसून येते. आता रब्बी हंगाम पुढे येऊन ठेपला आहे. गहू, हरभरा आणि कांदा या पिकांसह इतर पिके घेण्याच्या गडबडीत शेतकरी वर्ग आहे. या पिकांना खतांची नितांत आवश्यकता असून शासनाने ऐनवेळी पोत्यामागे खतांचे भाव 200 ते 300 रुपयांवर वाढवले. येणाऱ्या काळात अजूनही खताच्या दरात वाढ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांना विविध कंपन्यांकडून खतांसोबत वॉटर सोल्युबल खते, मायक्रोला आदींची लिंकिंग केले जाते. शेतकऱ्यांकडून या लिंकिंग प्रॉडक्टचा उठाव नसल्याने तो माल इतर खतांसोबत शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो. युरिया खत 266 रुपयांवर विक्री करू नये, असे निर्देश आहेत. परंतु युरिया वाहतुकीसाठी भाडे देत नसल्याने प्रत्येक पोत्यामागे दहा ते वीस रुपये ज्यादा दराने दुकानदारांना नाईलाजाने विक्री करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया दुकानदारांनी दिल्या आहेत.खरे तर युरियाची जादा दराने विक्री झाल्यास शेतकऱ्यांकडून देखील ओरड केली जाते. लिंकिंगमुळे दुकानदारांनी मोजक्याच खतांचा उठाव केला आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या दुकानांमध्ये बऱ्याच अंशी युरिया शिल्लक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. युरियाऐवजी इतर खतांची मात्रा मात्र या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. एकूणच रासायनिक खते आता शेतकऱ्यांच्या आवक्याबाहेरचा विषय झाल्याने शेतमालाला या रासायनिक खतांचा मात्रा कशा द्यायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादन खर्चात वाढ मात्र, बाजारभावात घट सोयाबीन एकरी 50 ते 100 रुपये किलो उत्पादन आणि त्यातही 3 हजार ते 3 हजार 500 रुपये प्रति क्विंटल भाव असल्याने अनेकांनी सोयाबीनची सोंगणी सुद्धा केलेली नाही. उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात मात्र घट होत असल्याचे जाधववाडी (ता. आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी आणि उपसरपंच संपतराव जाधव यांनी सांगितले. खत दरवाढीचा दणका 1 नोव्हेंबर 2025 सालापासून रासायनिक खतांचे नवीन दर पुढीलप्रमाणे : 10 – 26 -26 चा दर 1925 रुपयांवरून 2025 रुपये, असा झाला आहे. तर 12 -32 – 16 चा दर 1900 रुपये असून पुन्हा वाढून 2025 रुपये असा झाला आहे. 19 -19- 19 चा दर 1950 रुपयांवरून 2075 रुपये, अस झाला आहे. तर 14 – 35 -14 चा दर 1800 रुपयावरून 2175 रुपये एवढा 1 नोव्हेंबरपासून पुन्हा खत दरवाढीचा दणका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.