मुंबई – राज्यातील हवामानामध्ये मागील काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील अनेक भागात पाऊस झाला. त्यानंतर आता कुठेतरी वातावरण स्थिर होत असतानाच पुन्हा एकदा हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार 30, 31 मार्चसह 1 एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
याशिवाय राज्यातील इतर भागातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर बुलढाणा, गोंदिया, वाशीम, गडचिरोली, सांगली, कोल्हापूर, नाशिक, खानदेश आणि मुंबईसह कोकणातील 4 जिल्ह्यात आज आणि उद्या वातावरण ढगाळ राहणार आहे. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचे वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाळा आणि पावसाळा अशा दोन्ही वातावरणातचा अंदाज घ्यावा लागत आहे. मात्र या अवकाळी पावसाचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते.
दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पीकांचे मोठे नुकसान झाले होते. छत्रपती संभाजीनगरच्या करंजखेड आणि पिशोर परिसरात गारपीट पाहायला मिळाली होती. यासह लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात देखील अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हा मुद्दा नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील चर्चेत आला. विरोधकांनी देखील शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी सरकारकडे केली होती.