मुंबई : राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित शेतक-यांच्या खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरूम आणि कंकर दिला जाणार असल्याची माहिती आहे. जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्र्यांनी हा महत्तवपूर्ण निर्णय घेतला. पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिजे इत्यादींवर रॉयल्टी माफ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधित पूरग्रस्त शेतक-यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतक-यांच्या घराचे, पिकांचे आणि त्याचबरोबर जमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला सप्टेंबर महिन्यात महापूर आला होता. या पुरात शेतक-यांची पिके तर वाहून गेलीच, पण जमिनी वाहून गेल्या आहेत. जमिनीला १० ते १५ फुटाचे खड्डे पडले आहेत. नदीने पाण्याचा प्रवाहच बदलल्याने सगळे होत्याचे नव्हते झाले आहे. अशीच काहीशी परिस्थिती उर्वरित राज्यातील बहुतांश ठिकाणी बघायला मिळाली आहे. दरम्यान, या संकटात सापडलेल्या शेतक-यांना मायेचा आधार देण्यासाठी आता राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ३० जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत. गेल्या २ महिन्यांमध्ये राज्यात पावसाचे थैमान चालू असून, पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील १,७८५,७१४ हेक्टर (४,२८४,८४६ एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या काळात प्रामुख्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासोबतच भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद यांनाही मोठा फटका बसला आहे.