हैदराबाद – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पंतप्रधानपदासाठीचे चांगले उमेदवार ठरू शकतात असे प्रतिपादन एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या पेक्षा त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचे चांगले गूण आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.
काल येथील एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की देशातील सर्व राष्ट्रीय पक्ष देशातील समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर तुम्ही मला या तीन नावांपैकी पंतप्रधानपदासाठी तुम्ही कोणाची निवड कराल असा प्रश्न विचाराल तर मोदी आणि राहुल यांच्या पेक्षा के सी राव हेच मला या पदासाठी सर्वार्थाने योग्य वाटतात असे ते म्हणाले. मोदी आणि राहुल गांधी यांच्यापेक्षा राव यांना देशाची घटना चांगली माहिती आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली.
यावेळच्या निवडणुकीत केंद्रात बिगर भाजप आणि बिगर कॉंग्रेस सरकार सत्तेवर येईल आणि ते तेलंगणासाठी चांगले असेल असे मतही त्यांनी व्यक्त केले.