मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८०वा वाढदिवस असून राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच देशभरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देत अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, राजकारणात सदैव मतभेद पाहायला मिळतील, मात्र मनभेद कधीच
नाही. असेच भिन्न विचारसरणीचे मात्र अनेक राजकारण्यांचे मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांचा आज वाढदिवस.
शरद पवार यांना राजकारणात तब्बल 50 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तीन वेळा पदभार सांभाळला आहे. राज्याच्या हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्यांचा विशेष उल्लेखनीय निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देऊन त्यांना शासन निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणं.
भारताचे कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी शेती आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रात वाखाणण्याजोगे प्रयोग केले. शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन जीवनात पुढे जाऊ शकतात अशा सर्व विधेयकांना त्यांच्याकडून समर्थन मिळाले आहे आणि पुढेही मिळेल, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे कौतूक केले.
तसेच, करोना काळातही आपल्या वयाची पर्वा न करता, आपल्या सहयोगी पक्षातील काही नेत्यांना लाजवतील, असा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला घेतला आहे. राजकारणात आपले विचार आणि आपले आदर्श हे वेगळे राहतील. परंतु, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेर देखील नेहमीच मार्गदर्शन करत रहाल अशी मी आई अंबाबाईकडे प्रार्थना करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल ५० वर्ष पूर्ण करून अनेक राजकीय नेत्यांसाठी आदर्श असणारे मा. @PawarSpeaks जी यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. तुमच्या कार्याच्या अनुभवाचा फायदा आघाडी सरकारला व्हावा, अशी आशा आहे. तुम्हाला उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना. pic.twitter.com/fboQIK6c5S
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 12, 2020