Chandra Grahan 2026: यंदा जगभरात दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे होणार असली, तरी भारतातून दिसणारे एकमेव ग्रहण ३ मार्च २०२६ रोजी होणार आहे. या दिवशी देशाच्या काही भागांत खग्रास तर महाराष्ट्रात खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. ही माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप, महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिली आहे. त्यानुसार, दुपारी ३.२० वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होईल. त्यानंतर ४.३४ वाजता खग्रास चंद्रग्रहण सुरू होईल आणि सुमारे ५.३२ वाजता ते संपेल. मात्र या वेळेला भारतात चंद्र उगवलेला नसल्यामुळे ग्रहण प्रत्यक्ष पाहता येणार नाही. संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतरच विविध राज्यांत ग्रहणाचे दर्शन होईल. भारतामध्ये केवळ अरुणाचल प्रदेशातून पूर्ण खग्रास चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसेल. कोलकाता येथे सुमारे ९० टक्के ग्रहण दिसेल. गडचिरोली येथे ३० टक्के, चंद्रपूर आणि नागपूर येथे चंद्र उगवताना सुमारे २५ टक्के ग्रहण दिसेल. पुण्यात अंदाजे १० टक्के, तर मुंबईत फक्त १ टक्का खंडग्रास ग्रहण दिसण्याची शक्यता आहे. Chandra Grahan 2026 विदर्भात संध्याकाळी ६.१८ ते ७.३३ या वेळेत अल्प प्रमाणात ग्रहण दिसेल. महाराष्ट्रातून हे ग्रहण सुमारे १ तास ३५ मिनिटेच पाहता येईल. ग्रहण पूर्व क्षितिजावर असल्यामुळे ते फारसे आकर्षक दिसणार नाही. उंच जागेवरून, घराच्या टेरेसवरून किंवा टेकडीवरून पाहिल्यास दर्शन थोडे स्पष्ट होऊ शकते. हे चंद्रग्रहण पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत तसेच ऑस्ट्रेलिया, आशिया आणि अमेरिका या भागांतही दिसणार आहे. यापूर्वी १७ फेब्रुवारीला जगातील काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. पुढे १२ ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण आणि २८ ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले की, ग्रहणे ही पूर्णपणे वैज्ञानिक घटना आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा न बाळगता त्यांचे निरीक्षण आणि अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. चंद्रग्रहण पाहण्यासाठी विशेष सुरक्षेची गरज नसते. हे ग्रहण साध्या डोळ्यांनीही सुरक्षितपणे पाहता येते. मात्र दुर्बिणीतून फारसा वेगळा अनुभव मिळणार नाही. एकूणच, ३ मार्च रोजी होणारे हे चंद्रग्रहण भारतासाठी यंदाचे पहिले आणि शेवटचे दर्शन असणार आहे. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी ही एक खास संधी ठरणार आहे.