Weather Alert : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असले तरी हवामानात बदल होत आहे. त्यामुळे राज्यात 30 मार्चपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो, असे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे. कृषी विभागाकडून आवाहन संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. 1 ते 4 एप्रिल वादळी पावसाची शक्यता 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. हेही वाचा : Jejuri News : स्व. मेहबूबभाई पानसरेंच्या स्मृती जपणार! जेजुरीत उभं राहणार ‘हे’ खास उद्यान; नगराध्यक्षांची मोठी घोषणा