दिल्लीतील अभ्यास दौऱ्यात आठवणींना उजाळा
भाऊ ठाकूर/ तुकाराम कत्तुरे
राहू/मलठण – राजकारणातील चाणक्य अर्थात शरद पवार हे दौंडच्या जुन्या आठवणीत रमले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी क्षेत्रावर त्यांना वक्तव्य करीत आठवणीला उजाळा दिला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील पत्रकारांसाठी दिल्ली येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. पत्रकारांनी दिल्लीतील संसद भवन, अधिवेशनास भेट दिली. यावेळी शरद पवार यांच्या जनपथवरील निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
यावेळी शरद पवार हे दौंड तालुक्यातील जुन्या आठवणीत रमले. यावेळी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील जुन्या आठवणी, किस्से आदींवर प्रकाशझोत टाकत त्यांनी 1960- 1970 च्या कार्यकाळात सर्व पत्रकारांना नेऊन ठेवले.
यावेळी शरद पवार यांनी दौंडचा आठवडे बाजार, पाणीपुरवठ्याच्या उद्घाटनाचा विषय असेल किंवा तालुक्यात फिरत असताना राहू, पिंपळगावसारख्या गावात जातानाचा होडीने केलेला प्रवास यावर आठवण सांगितली. तत्कालीन सहकाऱ्यांची आठवणींना त्यांनी तितक्याच आपुलकीने आत्मीयता व्यक्त केली. त्यातून येणाऱ्या भावनिक विषयाला त्यांनी स्पर्श केला. यावेळी सर्व पत्रकार हे ऐकत असताना संपूर्ण हॉल भावनिक झाला होता.
सर्व आठवणी सांगत असताना शरद पवार यांच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास आणि उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी सर्वांना त्यांच्यातील भावनिकतेचा अभ्यास जवळून न्याहळता आला. माणूस कितीही मोठा झाला तरी जुन्या आठवणीने तो हळवाच होत असतो. हे यावेळी दिसून आले. शरद पवार हे अनेक गोष्टींना उजाळा देत असताना पत्रकारांनी अनेक वेगवेगळ्या अंगांनी प्रश्न विचारले. तेवढ्याच मनमोकळेपणाने त्यांनी उत्तरे दिली. पवार यांनी दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्यातील पाणीप्रश्नांवर प्रकाश टाकला.
ते म्हणाले की, पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. धरणातून होणारा पाणीपुरवठा हा ग्रामीण भागात म्हणजेच दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्यांतील शेतीसाठी आवश्यक आहे. मात्र, पाणी आवश्यक असल्याने ते सर्वांसाठी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात अडचणी येऊ शकतात. यावेळी दौंड तालुक्यातील शैक्षणिक अनुशेषावर देखील त्यांनी चर्चा केली. दौंडमध्ये शिक्षणसंस्था बाबतीत अजून मोठे काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. तो विषय लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे. दौंडचे रामभाऊ टुले, अजित शितोळे, सचिन काळभोर, पत्रकार उपस्थित होते.
..तर शेतीला एक थेंबही मिळणार नाही
शरद पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना खडकवासला धरणातून उपलब्ध पाणीसाठ्यातून काही प्रमाणात पाणी दिले होते. मात्र, सध्या ते पाणी पुणे शहराला दिले जाते. दौंड, बारामती, इंदापूर तालुक्याला पाणीसाठा कमी करून पिण्यासाठी पाणी जास्त दिले जात आहे. तरीसुद्धा पुणे शहरासाठी हे पाणी कमी पडत आहे. हे जर असेच राहिले तर तीन तालुक्यांत भविष्यात शेतीसाठी पाण्याचा थेंबही मिळणार नाही. मुख्यमंत्री असताना दोन धरणे बांधली. त्यामुळे बऱ्यापैकी पाणीटंचाई दूर झाली. परंतु वाढती लोकसंख्या यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी धोरणात्मक काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी मी देखील प्रयत्नशील आहे.