मुंबई – लोककलेला नवा साज चढवून मराठी माणसाच्या मनाला भुरळ घालणारे लोककलावंत छगनराव चौगुले यांचे आज निधन झाले. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुळात जागरण गोंधळी असलेल्या छगन यांनी लोककलेचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र, त्यांच्यातील अंगभूत गुणांमुळे ते लोककलावंत म्हणून प्रसिद्ध झाले. कला सादर करण्याची त्यांची पद्धत ही इतरांहून वेगळी होती. छगन चौगुले यांनी कुलदेवतांची गाणी आणि लोकगीते विशेष गायली.
“कथा चांगुणाची’, “कथा श्रावण बाळाची’, “आईचे काळीज’, “अंबाबाई कथा : कथा तुळजापूरची भवानी’, “कथा देवतारी बाळूमामा’ यांच्या ध्वनिमुद्रिका आजही मराठी माणसांमध्ये लोकप्रसिद्ध आहेत. पण “खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली…’ या गाण्याने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये छगन चौगुले यांचे हे गाणे आवर्जून गायले जाते.
छगनराव चौगुले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील लोकगीतं, लोककला, लोकसंस्कृतीच्या प्रचार, प्रसारसाठी छगनरावांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. छगनरावांनी सांगितलेल्या देवदेवतांच्या कथा, गायलेली कुलदेवतांची गाणी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.