हनुमंत मस्तुद परंडा : धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले. याशिवाय मनुष्य व पाळीव जनावरांची देखील जीवित हानी झाली. याप्रकरणी आज केंद्र सरकारच्या पथकाने ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सरीन यांच्या नेतृत्वात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली. परांडा तालुक्यातील खासगाव येथील व वागेगव्हाण या गावांना भेटी दिल्या. तसेच खासगाव येथे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी दत्तात्रय सातपुते आणि प्रदीप शहा यांच्या शेतीची पाहणी केली. उल्फा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले. यावेळी पथकाने उल्फा नदीच्या पुलावरून नदी पात्राची पाहणी केली. तसेच वागेगव्हाण येथील नुकसान झालेल्या शेतीची आणि घराची पाहणी केली आणि सीना नदीच्या काठावरून पुरबाधित ग्रामस्थांकडून पुरपरिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, या पथकात वित्त मंत्रालयाचे उपसचिव कंदर्प पटेल, ग्रामीण विकास मंत्रालयाचे उपसचिव अभिषेक कुमार राज आणि जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सतेंद्र प्रताप सिंग यांचा समावेश आहे. या दोन्ही गावांना पथकाच्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, सहायक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंताआडे, तहसीलदार मनिष काकडे, प्रभारी गटविकास अधिकारी मोहन राऊत यांची उपस्थिती होती.